ऐश्वर्या रेड्डी. मागील वषी तेलंगणा राज्याच्या बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकली होती. 98.5ज्ञ् एवढे अगडबंब मार्क मिळवल्यामुळेच तिला दिल्लीतील ‘लेडी श्रीराम महाविद्यालया’त विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता. नवी दिल्लीतील सुप्रति÷ित महाविद्यालयांसाठी प्रवेशाचा ‘कट ऑफ’ ऐकणे, हा कुणाही संवेदनशील माणसांच्या पोटात गोळा आणणारा विषय आहे. काही ठरावीक महानगरांमधील महाविद्यालये-विद्यापीठांकडे प्रवेशासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा हा खरेतर कौतुकाचा विषय नसून प्रादेशिक विद्यापीठांनी गमावलेल्या लौकिकाचा आणि गुणवत्तेचा आहे.
हैद्राबादच्या शादनगरमध्ये राहणाऱया ऐश्वर्याला भारत सरकारची ‘इन्स्पायअर’ ही मानाची शिष्यवृत्तीही मिळत होती. कोविड-19च्या प्रकोपामुळे तिला मार्च महिन्यात दिल्ली सोडून हैद्राबादला परतावे लागले होते. वडील कामगार आणि आई घर सांभाळून कपडे शिवणारी गृहिणी. एकूण परिस्थिती जेमतेम. घरात शिकणारी अजून एक धाकटी बहीण. मोबाईलवर शिकणे प्रभावी ठरत नव्हते. महाविद्यालये बंद होऊन आठ महिने झाले होते. ऑफलाईन शिक्षण कधी सुरू होणार याची स्पष्टता नसल्यामुळे तिला निराशेने घेरले असावे. वर्गातील बहुतेक जणींकडे लॅपटॉप असल्यामुळे तिलाही आपल्याकडे लॅपटॉप असावा असे वाटत असणार. घरची विपन्न परिस्थिती, संवादाची झालेली सार्वत्रिक कोंडी, कुणाकडे मदत मागावी या बाबतची अस्पष्टता. यातून सुटका मिळवण्यासाठी अखेरला ऐश्वर्याने आपली इहयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने नुकताच (10 सप्टेंबर) ‘आत्महत्या प्रतिबंध’ दिवस पाळला होता. गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहकार्यातून आणि समन्वयातून संपूर्ण जगभरामध्ये निराशा, औदासिन्य, चिंता, कंटाळा, चिडचिड, एकटेपणा, निरसता, अकारण थकवा, निद्रानाश यासारख्या मनोविकारांच्या लक्षणांवर जाणीवजागृतीचे काम होत आहे. आत्महत्येचे विचार मनात बळावल्यास त्यापासून परावृत्त होण्यासाठी शासकीय-अशासकीय पातळीवर ‘हेल्पलाईन’ही उपलब्ध असतात. भारत सरकारची ‘किरण’, टाटा इन्स्टिटय़ूटची ‘आय कॉल’, नवी दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठाची ‘अहसास’ ही काही वानगीदाखल उदाहरणे. हेल्पलाईनची पूर्णवेळ उपलब्धता, फोन घेणाऱया व्यक्तिंची व्यावसायिक क्षमता, संसाधनांची उपलब्धता इ. प्रश्न असले तरी अनेक जिल्हय़ांच्या ठिकाणी भावनिक प्रथमोपचार केंदेही दिसत आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक मानसोपचारतज्ञ, प्रशिक्षित समुपदेशक-सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून संवादपीठेही उभी राहत आहेत. शिक्षण संस्थांनी यासारख्या उपक्रमांच्या केंद्रस्थानी राहून समन्वयाची आणि क्षमता बांधणीची जबाबदारी घेतल्यास संस्थात्मक बळ लाभू शकेल. विद्यार्थी स्वयंसेवकांसमोर काही रचनात्मक-सकारात्मक काम दिसल्यास उत्साह दुणावण्यासोबत त्यांचेही प्रशिक्षण होईल. सत्तरीच्या, ऐंशीच्या दशकांमधील अनेक प्राध्यापक मंडळी स्वत:ला आपापल्या कलानुसार सामाजिक उपक्रमांशी जोडून घेताना दिसायची. म्हणूनच त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांचा गोतावळा असायचा. प्राध्यापक संघवादी, साम्यवादी, समाजवादी विचारसरणीने कोणताही ‘वादी’ असू द्या, तो विद्यार्थीकेंद्री आणि विद्यार्थीसन्मुख असणे गरजेचे आहे. उत्तर आधुनिक काळात प्राध्यापक वर्गामधील वाढत चाललेली टोकाची आत्ममग्नता आणि संवादहीनता हा देखील व्यावसायिक औचित्याचा आणि चिंतेचा मुद्दा सांप्रत काळात ठरावा.
कोविड-19, संसर्ग प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलला विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्रिसूत्री कार्यक्रम सुचवला होता. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सामाजिक-मानसशास्त्रीय गरजा आणि त्यांचे कल्याण आश्वस्त करण्यासाठी हेल्पलाईनची स्थापना करणे. हेल्पलाईनचे समुपदेशक आणि निर्देशित प्राध्यापकांद्वारे नियमितपणे सनियंत्रण आणि व्यवस्थापन करणे. दोन शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना ताण-तणावापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहतील. त्यासाठी पत्र, निवेदन, ई-मेल, डिजिटल अथवा सामाजिक माध्यमांचा वापर करतील. तीन विद्यार्थ्यांना तातडीची मदत देण्यासाठी वसतीगृहांचे गृहपाल आणि वरि÷ शिक्षक यांच्या मदतीने ‘कोविड-19’ मदत गट स्थापन करावेत. सचिवांनी पाठवलेल्या या पत्रात सर्वंकष आरोग्याबाबत माहिती-व्हीडिओचे 5-6 संदर्भही आहेत. या पत्रानुसार अनेक शिक्षणसंस्थांनी आश्वासक रचना उभ्या केल्या असतील. संस्थात्मक कामामध्ये योगदान करायला अनेकांना आवडतदेखील असते. अनेक संस्थाप्रमुखांचा अहंकार आणि स्वयं प्रमाणित तज्ञता इतरांची भागिदारी मिळवण्यामध्ये कमी पडते. पर्यायाने समित्या कागदावरच राहतात. अनेक संस्थांमध्ये प्राध्यापकांना सहभागाबद्दल विचारलेदेखील जात नाही. संमती न घेता, परस्पर समितीच्या कार्यकक्षा आणि रूपरेखाही ठरवल्या जातात. मानसिक आरोग्याबाबत काम करणाऱया यंत्रणेची होकारात्मक (?) मानसिकता हा एक अजून गंभीर विषय आहे.
विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या, आत्महत्येच्या दुर्दैवी घटना घडून गेल्यावर त्यावर एरव्ही निरोद्योगी असणाऱया मंडळींचे राजकीय उद्योग सुरू होतात. ते अधिक दुर्दैवी. विद्यार्थी संघटनांची तत्कालिक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया समजण्याजोगी आणि समर्थनीय जरी असली तरी फावल्या वेळात माजी विद्यार्थ्यांकडून निधी आणि मदत उभारणे, प्लेसमेंट सेल चालवणे, विद्यापीठात येणाऱया नानाविध शिष्यवृत्त्यांचे सनियंत्रण करणे, विद्यार्थी कल्याण निधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे, शिक्षण पूरक आणि सहाय्यकारी उपक्रमांची बांधणी करणे यासारख्या कार्यक्रमांपासून विद्यार्थी संघटनाही अलिप्त राहतात. विद्यार्थी संघटनांनी तटस्थपणे आणि व्यावसायिकपणे काम केल्यास चांगल्या विद्यार्थीहिताच्या गोष्टी उभ्या राहू शकतात. शिक्षणसंस्थांनीदेखील आपापल्या शहरातील शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने, विषयतज्ञांच्या सहभागातून काही संस्थात्मक जागा उभ्या करायला हव्यात. नव्हे ती काळाची गरज आहे.
देशाच्या सामाजिक-शैक्षणिक इतिहासात मॅट्रीक परीक्षांना विद्यार्थी परगावी जाऊन तेथील धर्मशाळेत, चावडीत वा मोठय़ा इसमांच्या घरी राहिल्याच्या आठवणी आहेत. आपल्या गावात येऊन परीक्षेला बसणाऱया या विद्यार्थ्यांचे सर्वांना अप्रुप असायचे. गावातील अनेकजण या विद्यार्थ्यांसाठी यशाशक्ती उजेडासाठी कंदील, अंघोळीसाठी पाणी, पांघरुण, चहा-जेवण इत्यादि गोष्टींची तजवीज करीत. हा सामाजिक पाठिंबा आणि आधार जगलेली पिढी अजून जिवंत आहे. आज बदललेल्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत गरजा बदललेल्या आहेत. कुणाला इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, अभ्यासासाठी जागा हवी असेल. अनेक पिढय़ानंतर ऐश्वर्यासारख्या मुली महाविद्यालयापर्यंत पोहोचत असतात. या मुलींची यशाशक्ती काळजी घेणे, त्यांच्या मागे मदत उभी करणे ही समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.