प्रतिनिधी / दहिवडी :
पोलीस व सैन्यदलाप्रमाणे प्रशिक्षण मिळाल्याने माणमधील गावागावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटलांना अधिक बळ मिळाले आहे. आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ही ‘आर्मी’ आता सज्ज झाली आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलीच पोलीस पाटील आर्मी या निमित्ताने उदयास आली आहे.
आपसातील वाद विवाद, तंटे सोडविण्याबरोबरच प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी गावागावात पोलीस पाटील नियुक्त करण्यात आले आहेत. या पोलीस पाटलांना गावात आदराचे स्थान मिळावे, त्यांच्या आचारविचारात सकारात्मक बदल घडावेत तसेच गावाच्या सुरक्षेसाठी माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी पोलीस पाटील आर्मीची संकल्पना मांडली. या संकल्पनेला पोलिस पाटलांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आगेकूच केली.
गावात अग्रस्थानी असलेल्या या पदाला मान मिळावा या दृष्टीने पोलीस पाटलांच्या व्यक्तिमत्व विकासासासाठी पहिल्या टप्प्यात प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी पोलीस पाटलांना कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. गावात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गोंधळून न जाता या परिस्थितीशी सामना करण्यासाठी इतर गावातील पोलीस पाटलांनी देखील मदतीला धावून येण्याची गरज असते. या सामूहिक प्रयत्नाने धोका परतविण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिस्तीसाठी सर्व पोलीस पाटलांना पोलिसांप्रमाणे एक सारखा गणवेश, कॅप, बूट याचेही नियोजन करण्यात आले आहे. मानसिकता वाढविण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीसाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी दर रविवारी शारीरिक व्यायाम,कवायत तसेच संचलनाचा सराव घेतला जात आहे. यासाठी चैतन्य अकॅडमीचे संदीप खाडे यांच्यासह सेवानिवृत्त जवान व पोलीस स्वयंपूर्तीने सहकार्य करत आहेत. या प्रशिक्षणामुळे माण तालुक्यातील शंभर पोलीस पाटलांची फौज आता अधिक सक्षम झाली आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी पोलीस पाटलांची ही आर्मी तालुकास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रमावेळी संचलन करण्यासाठी सज्ज झाली आहे.