प्रतिनिधी / मेढा :
जावली तालुक्याबरोबरच महाबळेश्वर, पाटण व सातारा जिल्ह्यातील अन्य तालुक्यावर आस्मानी संकट कोसळे असून, या संकटातून शेतकऱ्याला उभारी घेण्यासाठी राज्याचे महाविकास आघाडी सरकार कटीबध्द आहे. नुकसानग्रस्त शेतकयांना अधिकाधिक भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सविस्तर करावेत. एकही शेतकरी चुकता कामा नये. अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जावली तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व गावांची पाहणी केल्यानंतर जावली पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला व दौऱ्यामध्ये आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी पालकमंत्री व आमदार शशिकांतजी शिंदे , सभापती जयश्रीताई गिरी, माजी सभापती बापूराव पार्टे आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, भौगोलीकदृष्टया जावली तालुका हा दुर्गम, डोंगराळ तालुका असल्याने अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. जिल्ह्यातील नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु. वाहुन गेलेल्या शेतीची दुरुस्ती करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देवू, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.