नेतेमंडळींनी पूरपरिस्थितीत रात्रंदिवस काम करीत असलेल्या शासकीय यंत्रणेच्या मदतकार्यात मात्र खो घालण्याचे काम केले. जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार मात्र उभ्या महाराष्ट्राने पाहिला.
महापूर ओसरल्यानंतर पाहणीच्या नावाखाली सुरू झालेले दौरे आज 17 दिवस उलटून गेल्यानंतरही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. ढीगभर मंत्री, राजकीय नेत्यांपासून अनेकांनी शासकीय यंत्रणेला वेठीस धरून पाहणी केली. मात्र पदरात काय तर घरात पाणी शिरलेल्यांना दहा हजार, तर दुकानदाराना 50 हजाराची मदत तीही अजून 80 टक्के जणांपर्यंत पोहचलीच नाही. निव्वळ दौरे करण्यापेक्षा साफसफाईस हातभार लागला असता तर सोयीचे ठरले असते. 22 जुलैला अतिवृष्टी झाली त्याचदिवशी पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरीत होते. हे दोघेही गुहागरमार्गे चिपळूणला आले आणि पाहणी करून निघून गेले. पालकमंत्री परब हे येथून थेट मुंबईला निघून गेले. वास्तविक जिल्हय़ाचे पालकत्व त्यांच्याकडे असल्याने पालकाप्रमाणे त्यांनी येथे थांबून मदतकार्यावर लक्ष ठेवणे आवश्यक होते. मात्र तसे न होता ते थेट चार दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दौऱयात आले. तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सलग दौरे चिपळुणात होत होते. त्यांनी 24 जुलैच्या आढावा बैठकीत सुरू असलेले मदतकार्य आणि पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचाही 24 जुलैला दौरा झाला. त्यांनी पूरग्रस्त शहराला बोटी तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने 15,000 रु. देण्यात येतील अशी घोषणा केली. 25 जुलै रोजी तर नेत्यांच्या दौऱयांचा कहरच झाला. या एकाचदिवशी मुख्यमंत्री ठाकरेंसह पालकमंत्री ऍड. परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे दौरे झाले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील पाहणीनंतर आपण मदत निश्चितच करणार आहे. मात्र सवंग घोषणा आज करणार नाही असे सांगतानाच तातडीची मदत आणि पूरग्रस्ताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. तसेच नैसर्गिक आपत्ती येणाऱया जिल्हय़ात यापुढे आपत्ती निवारण दल स्थापन करणार असल्याचे सांगतानाच केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करणार असल्याचेही सांगितले. केंद्रीय मंत्री राणे यांनी केंद्राकडून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. 27 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले. त्यांनी केंद्राकडून मदतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत पूरग्रस्तांना तातडीने शासकीय मदत पुरवा असे निर्देश जिल्हा यंत्रणेला दिले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आठवडाभरातच सलग दोन दौरे झाले. 28 रोजीच्या पहिल्या दौऱयात त्यांनी येथील नगरपरिषदेला शहर स्वच्छतेसाठी तातडीने दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर पूर ओसरल्यानंतरची येथील परिस्थिती पाहून त्यांनी ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथील सफाई कामगारांसह आवश्यक यंत्रसामुग्री, वरिष्ठ अधिकाऱयांचे पथक, आरोग्य विभागाची पथके औषध साठय़ासह येथे पाठवली, तर 1 ऑगस्टच्या दुसऱया दौऱयात मदतकार्याचा आढावा घेतला. 29 जुलैला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा दौरा झाला. मात्र पूरग्रस्त व्यापारी, शेतकऱयांसंदर्भात वीजबिलाचा विषय पत्रकारांनी काढल्यानंतर पत्रकार परिषद अर्ध्यावरच सोडून ते निघून गेले. 30 जुलैला खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या दौऱयात कोळकेवाडी धरणातून झालेल्या विसर्गामुळे चिपळुणात पूर आल्याची शक्यता वर्तवून याबाबत चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी केली. 1 ऑगस्टला राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या दौऱयात कोकणात बचावकार्य अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले तर दौऱयावर आलेल्या खासदार संभाजीराजे यांनी केंद्राकडून नुकसानग्रस्ताना मोठे पॅकेज मिळवून देईन असे सांगितले. याचबरोबर भाजपाकडून माजी मंत्री विनोद तावडे, गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, चित्रा वाघ, माजी आमदार प्रमोद जठार, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याबरोबरच काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार नसीम खान, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस सदानंद चव्हाण, मनसेकडून नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश जाधव, शालिनी ठाकरे आदी राजकीय नेतेमंडळीनी पाहणी दौरे केले. राष्ट्रवादीकडून तटकरे, आमदार रोहित पवार सोडले तर फारसे कुणी फिरकलेले नाही. राजकीय मंडळींबरोबरच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद यांनीही भेट देऊन पूरग्रस्तांना मदत केली. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी तर आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून चार कोटीचा निधी पूरग्रस्तांसाठी येथे खर्च करणार असल्याचे सांगितले. राज्याच्या कानाकोपऱयातून चिपळूणकरांना भरघोस मदत आली. प्रारंभी मदत वाटपात गोंधळ उडाला होता. मात्र नंतर सारे व्यवस्थित झाले. तरीही काहींची सहा महिने पुरेल एवढय़ा मदतीने घरे भरली, तर काहींची रिकामीच राहिली. काही संस्था, मंडळे तसेच सिद्धगिरी मठ, नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, संत निरंकारी मंडळाच्या कार्यकर्त्यानी शहरातील गटारे, उघडय़ावरील कचरा साफ करण्याबरोबर लोकांची घरेही स्वच्छ करण्यात मदत केली. राजकीय नेते, मंत्र्यांच्या दौऱयातून काहीच फलनिष्पती झालेली नाही. येथे येऊन नेतेमंडळींनी रात्रंदिवस काम करीत असलेल्या शासकीय यंत्रणेच्या मदतकार्यात मात्र खो घालण्याचे काम केले. जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार मात्र उभ्या महाराष्ट्राने पाहिला हे मात्र खरे.