‘आरोग्य’ आणि ‘शिक्षण’ या राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असणाऱया क्षेत्रांमध्ये गेली अनेक दशके मूलभूत बदल घडवून न आणल्यामुळे वर्तमानातील आव्हाने आता आपल्याला मोठय़ा संकटांसारखी वाटायला लागली आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेचा अदमास असताना, पहिल्या लाटेपासूनच पूर्वतयारी न केल्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक जर्जर झाली आहे. शिक्षण क्षेत्राबाबतही चांगले बोलण्यासारखी परिस्थिती मुळीच नाही. खरेतर, इतर कोणत्याही संघटित क्षेत्रापेक्षा या क्षेत्रातील मनुष्यबळ तुलनेने सुस्थितीत आहे. राष्ट्राला उभारी देण्याचे काम मुख्यत्वे, उच्च शिक्षण क्षेत्रासमोर असते. ही जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता दुर्दैवाने या क्षेत्राकडे दिसत नाही. राष्ट्र म्हणून जबाबदार आचार-विचारांचे नागरिक घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये घडत असते. महाविद्यालये आणि विद्यापीठे या संस्थांपेक्षाही जास्त कालावधी विद्यार्थी घरात, समाजात आणि समाजमाध्यमात वावरत असतात. ही वस्तुस्थिती असली तरी, विद्यार्थ्यांचे मानसिक, भावनिक आणि बौद्धिक पोषण करण्याच्या जबाबदारीपासून शिक्षकांना आणि शिक्षण व्यवस्थेला पळ काढता येणार नाही. शिक्षण संस्थांचा ‘लौकिक’ आणि ‘गुणवत्ता’ ही भौगोलिक स्थान, संसाधनांची उपलब्धता या घटकांपेक्षाही संस्थांच्या नेतृत्वावर आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास जागतिक गुणवत्ता यादीत झळकणारे इंग्लडमधील ‘कोरोनेल’ विद्यापीठ वा जपानमधील ‘ओकेनाव्हा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’ या तेथील ग्रामीण प्रांतातील संस्था आहेत. संघटित प्रयत्नांमुळे आणि उच्च शैक्षणिक बांधीलकीमुळे आज या संस्था जागतिक पातळीवर ओळखीच्या झाल्या आहेत. राष्ट्रावरील संकट काळात आणि संक्रमण काळात (विषाणुंच्या नव्हे) मनुष्यबळ घडवणारे नेतृत्व हतबल होऊन बसले आहे की उद्याच्या तयारीची सज्जता उभारत आहेत, यावर देशाचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपल्याकडे उद्याच्या तयारीपेक्षा आजचा दिवस ढकलण्याकडे कल असल्यामुळे प्रश्नांची जटिलता आणि संकटांचे गांभीर्य वाढत असते.
अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन या शिक्षक आणि विद्यार्थी उभयतांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पायऱया आहेत. प्रत्येक पायरीवरील प्रामाणिकता, वस्तुनि÷ता आणि सर्वंकषता गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असते. आज देशातील प्रत्येक चौथा आणि पाचवा नागरिक हा अनुक्रमे ‘युवक’ आणि ‘तरुण’ गटामध्ये मोडणारा आहे. कोणत्याही सुजाण समाजाला प्रागतिकता, आधुनिकता आणि स्वायत्ततेच्या ओढीने तंत्रस्नेहाचे आकर्षण असते. आज देशामध्ये इंटरनेटची व्याप्ती अवघी 50… आहे. हे वास्तव मान्य करूनही शिक्षकांमधील अध्यापन लवचिकता विद्यार्थ्यांमधील शिकण्याचा ताण कमी करू शकते. बिहारमधील पटणा येथे वास्तव्य असलेल्या ‘फैजल खान’ या शिक्षक तरुणाचे शिक्षणविषयक यू टय़ूब व्हीडिओ पाहिल्यास प्रादेशिक भाषेमधील अध्यापन किती रंजक आणि मोहक असू शकते याचा प्रत्यय येतो. खान सरांचे व्हीडिओ बिहारमधील युवकांना त्यांच्या वेळेनुसार, इंटरनेट उपलब्धतेनुसार पाहता येतात. ऑनलाईन शिक्षण हे वर्तमानातील वास्तव असले तरी अध्यापन प्रक्रियेमधील विद्यार्थी या महत्त्वपूर्ण घटकाच्या अध्ययन अनुकूलतेबाबत विचारही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी ठरावीक वेळेतच शिकण्याचा अनाठायी दुराग्रह हा अध्यापनाच्या आणि पुढे चालून मूल्यांकनाच्या विश्वासार्हतेबाबतचा प्रश्न आहे.
ऑनलाईन अध्यापन ही कोरोनाच्या आपत्तीमुळे काही शिक्षकांच्या वाटय़ाला आलेली आणि अपरिहार्य ठरलेली बाब आहे. ऑनलाईन शिक्षणप्रणाली ही रंजक, गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्री, अवधान आणि अध्यापन प्रवणदेखील करता येते. जगभरातील ‘कोर्सेरो’ सारख्या माध्यमांनी हे दशकापूर्वी वापरलेले ‘डिजिटल लर्निंग मॉडय़ूल’ आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर शिक्षकांसाठी ‘डिजिटल लर्निंग अँड टेक्नोलॉजी सपोर्ट सेंटर’ उभे राहिल्यास अनेक गोष्टी सहज मार्गी लागू शकतात. कोरोनाने शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याच्या मोठय़ा संधी आपल्या दाराशी आणून ठेवल्या आहेत. शिक्षकांना आणि शिक्षणसंस्थांना खऱया अर्थाने स्वायत्ततेचा आनंद घेण्यासाठी तंत्र सुगमताच उपयोगी ठरणार आहे. कोरोनाच्या प्रदीर्घ काळात, मोठय़ा टाळेबंदीचा अनुभव घेऊनही शिक्षकांच्या क्षमता बांधणीचे कोणतेही धोरण आपल्याला आखता न येणे, त्यासाठीच्या आवश्यक संस्थात्मक रचना उभ्या न करणे हा दृष्टिकोन अवसानघातकी आहे. विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना शिक्षकांच्या क्षमतावृद्धीचे सातत्यपूर्ण आणि स्थायी प्रारूप उभे करणे सहज शक्मय आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्तीचीच गरज आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये काही शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान स्वयंस्फूर्तीने आत्मसात केले आहे. स्वयंस्फूर्त शिक्षकांना प्रोत्साहन आणि बढोत्तरी, इच्छुकांना प्रशिक्षण आणि नैसर्गिक मर्यादा असणाऱया शिक्षकांसाठी अभिनव पर्याय या त्रिसूत्रीतून सहज मार्ग निघू शकतो. आपल्याकडे अभ्यास विषयानुसार, ज्ञानशाखानुसार शिक्षकांची मंडळे वा संघटना असतात. शिक्षक संघटनांच्या भागिदारीमधून आपल्याला अभ्यास विषयांच्या हस्तपुस्तिका तयार करणे सहज शक्मय आहे. स्वयं अध्ययनाला प्रोत्साहन देणाऱया हस्तपुस्तिका तयार झाल्यास आणि या हस्तपुस्तिकांमध्ये संग्राह्य व्याख्यानांचे ‘क्मयू आर’ कोड सम्मीलित केल्यास शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्याही मनावरचा ताण कितीतरी पटीने कमी होऊ शकतो. येथेही प्रश्न इच्छाशक्तीचाच आहे.
अध्यापनाचे सुगमीकरण झाल्यानंतर मूल्यांकनाचा प्रश्नही सहज मार्गी लागू शकतो. काही शाळांमध्ये, आयआयटी वा राष्ट्रीय महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये वार्षिक (समेटिव्ह) आणि सातत्यपूर्ण मूल्यांकनाचे (फॉर्मेटिव्ह) एकसंध प्रारूप अवलंबिले जाते. ज्या शिक्षणसंस्थांनी सातत्यपूर्ण मूल्यांकन पद्धती वापरली आहे, तिथे परीक्षांच्या रदबदलीनंतरही कोणतेच गोंधळ निर्माण झालेले नाहीत. विद्यार्थी, पालक वा दस्तुरखुद्द शिक्षण संस्थांमध्येही निराशा, भीती वा दबावतंत्राच्या राजकारणाला बळी जाण्याचा प्रश्न उद्भवला नाही. सातत्यपूर्ण मूल्यांकनाचा आशय शिकण्याची-शिकवण्याची परिणामकारकता तर सत्रात मूल्यांकनाचा आशय अभ्यासची परीक्षा आहे. पहिल्या प्रकारच्या मूल्यांकनातून शिकवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणता येऊ शकतात. विद्यार्थी एकापेक्षा अनेक वेगवेगळय़ा पद्धतीतून मूल्यांकनाला सामोरे जाऊन शिकतात. शिकणे आनंददायी आणि मूल्यांकन पारदर्शी-वस्तुनि÷ करणे हे पूर्णतः शिक्षकांच्या आवाक्मयातील गोष्ट आहे. कोरोना काळात मंत्रालयातील अधिकाऱयांनी सर्वांना एकाच पद्धतीच्या केंद्रीकृत फुटपट्टीत आणण्याच्या अध्यादेशाचे परिणाम शिक्षण क्षेत्राला आलेल्या मरगळीत सहज दिसून येतात. शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण, अधिकारांचे हस्तांतरण, पारस्परिक विश्वास आणि विद्यापीठांना प्रश्न मार्गी लावण्याचे स्वातंत्र्य दिल्यास अनेक गोष्टी सुलभ होऊ शकतात. कोरोनाचे शिक्षण क्षेत्राला अनेक धडे आहेत. ‘विद्यार्थी’ बनून शिकणार कोण हा यक्ष प्रश्न आहे.
डॉ. जगदीश जाधव