वार्ताहर / सावंतवाडी :
सावंतवाडी शहरात आग, पूर, झाडे पडून आपत्ती ओढवल्यास तात्काळ उपाययोजना होण्यासाठी सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘ऍक्शन प्लान’ तयार करण्यात आला आहे. सुमारे 44 पानांचा हा प्लान असून यामध्ये नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी नियुक्त करून ही टीम क्षणात परिस्थिती नियंत्रणाखाली आणणार आहे. या ऍक्शन प्लान पुस्तिकेचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी संतोष जिरगे, न. पा. आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक, नासीर शेख यांनी केला.
सावंतवाडी शहरात सुमारे 40 हजारहून अधिक लोकसंख्या आहे. 17 प्रभाग आहेत. ऐतिहासिक मोती तलाव आहे. दहा वर्षांपूर्वी मोती तलाव तुडुंब भरून वाहत होता. अशावेळी नैसर्गिक आपत्तीला सामोरे कसे जायचे, यासाठी संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून प्रथमच आपत्ती व्यवस्थापन ऍक्शन प्लान तयार करण्यात आल्याचे जिरगे यांनी स्पष्ट केले. शहरात मोती तलावात पूरस्थिती ओढवली. बाजारपेठेत पाणी साचले. प्रभागात झाडे तुटून पडली. हानी झाली. अशी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास, आग लागल्यास काय करायचे, यासाठी विभागवार नगरसेवक, कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्त केलेली टीम काही तासात आपत्ती निवारणासाठी दाखल होणार आहे. नैसर्गिक आपत्तीतून त्यांना सावरणे हा हेतू आहे. नागरिकांना हा ऍक्शन प्लान मोबाईलवर पाहता येणार आहे. या प्लानमध्ये नियुक्त टीमचे संपर्क क्रमांक असणार आहेत. या प्लानमुळे नैसर्गिक आपत्ती निवारणास मदत होणार आहे.