स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना पाठविली नोटीस
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर काही जण जखमीही झाले आहेत. स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. तेव्हा ती कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी घेऊन स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आपच्यावतीने जिल्हाधिकाऱयांचे आभार मानण्यात आले आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेकांना ये-जा करणे अवघड जात आहे. गेली चार ते पाच वर्षे ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. कामे पूर्ण करण्याकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत आहे. याचबरोबर स्मार्ट सिटीचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत. तेव्हा तातडीने संबंधितांना जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली होती. याचबरोबर स्मार्ट सिटीच्या कामांमुळे ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. त्याची दखल जिल्हाधिकाऱयांनी घेऊन ही नोटीस बजावली आहे.