प्रतिनिधी /कोल्हापूर
कोरोनाच्या संकटात काळात रायगडवर गर्दी करणे राष्ट्रहितासाठी घातक आहे. त्यामुळे येत्या 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन घरीच राहून साजरा करा. किल्ले रायगडवर दरवर्षी प्रमाणे गर्दी करू नका, आपला जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे, असे कळकळीचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यासह देशातील सर्व शिवभक्तांना केले आहे.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत गेल्या महिन्यात राज्यव्यापी दौरा केला होता. मुंबईमध्ये 28 मे रोजी सरकारपुढे तीन प्रमुख पर्याय आणि इतर मागण्या ठेवून त्याची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी 6 जूनचा अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकारने 6 जून पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यानंतर कोरोना बिरोना काहीही पाहणार नाही. थेट रायगडवरून आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला होता. त्यानंतर रायगडवर शिवभक्त एकत्रित येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी तमाम शिवभक्तांना घरी राहून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक दिन घराघरात
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यात तापलेल्या वातावरणात शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी संयमी भूमिका घेत गुरूवारी ट्व्टि केले. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने घरीच राहून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे मी आवाहन केले होते. त्याला तमाम शिवभक्तांनी प्रतिसाद देत घराघरात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. माझ्या विनंतीला मान दिला. मी देखील आपल्याला दिलेल्या शब्दानुसार कोरोना आणि निसर्ग वादळाच्या संकटात शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ात खंड पडणार नाही याची दक्षता घेतली. दुदैवाने या वर्षीही कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे घरीच राहून शिवराज्याभिषेक दिन साजरा करा, असे आवाहन मी करतो. स्वराज्यातील सर्व नियम छत्रपती शिवाजी महाराज स्वतहून पाळत असत. त्यांच्या आदर्शावर चालणार आपण शिवभक्त आहोत. आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडवर जावून शिवराज्याभिषेक दिन अखंडीतपणे आपल्या सर्वांच्या वतीने साजरा करण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी पार पाडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने वीस जणांना रायगडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नियमाचे पालन करत आपण सर्वांनी घरात राहून आपल्या कुटुंबीयांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करावा, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा राजसदरेवरून
मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिला आहे. त्याचबरोबर रायगडवरून पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाजीराजे कोणती भूमिका घेतात?, कोणता आदेश देतात? याकडे तमाम मराठा समाजासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आपल्या ट्व्टिमध्ये संभाजीराजे यांनी तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजगडवरील राजसदरेवरून घोषित करणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.