ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मजुरांचे चालू स्थलांतर साहजिक तथा गरजेचे असले तरी या स्थलांतरामुळे आपल्या समोरील कोविड -19 चे आवाहन आणखी वाढले आहे, कारण कोरोना आता मोठ्या प्रमाणात गावापर्यंत पोहचणार आहे, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.
देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत.
यावेळी मोदी यांनी मजुरांच्या स्थलांतराचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, लॉक डाऊन वाढवल्यामुळे स्थलांतराचा मुद्दा अधिक उग्र झाला आहे. सुरुवातीला आपण या मजुरांना जिथे आहात तिथेच थांबा असे सांगण्यात आले होते. मात्र, घरी जाण्याच्या ओढीने काही मजूर पायी चालत निघाले. त्यामुळे आपण निर्णय बदलला खरा, पण आता आपल्या समोर अजून एक मोठे संकट उभे राहिले आहे. आता गावांपर्यंत कोरोना पोहोचू न देण्याचे आवाहन आहे. असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
– तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मागितले विशेष अनुदान
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे एनएचएम फंड लवकरात लवकर देण्यात यावा तसेच तामिळनाडूसाठी 2000 कोटींचे विशेष अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली.
– भारताला एक टीम म्हणून काम करण्याची गरज
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, आम्ही एक राज्य या रुपात कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहोत. केंद्राने या अशा महत्वाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. आमच्या राज्याशी आंतरराष्ट्रीय आणि अन्य राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्यांचा सामना करताना आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढे त्या म्हणाल्या, सगळ्या राज्यांन एक समान महत्त्व दिले पाहिजे. तसेच आपल्या सर्वांना भारत एक टीम आहे असे समजून काम केले पाहिजे.
– नितीश कुमार म्हणाले, लॉक डाऊन वाढवा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अजून काही काळ लॉक डाऊन वाढवण्याची मागणी केली.
– आंध्रप्रदेशात वाढणार बेरोजगारीची समस्या
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपला मुद्दा मांडताना म्हटले की, लॉक डाऊनच्या काळात काही प्रमाणात सूट देण्याची गरज आहे. आमच्या राज्यात 97 हजार एमएसएसई चे कर्मचारी आहेत. तर नऊ लाख पेक्षा अधिक लोक यामध्ये जोडलेले आहेत. त्यामुळे या सेक्टरला सांभाळण्यासाठी लॉक डाऊनमध्ये देखील काही प्रमाणात सूट दिली पाहिजे नाहीतर आंध्र प्रदेशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू मोबाईल ॲप किती महत्त्वाचे आहे, हे सांगत लोकांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितले.
दरम्यान, अजूनही ही बैठक सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत लॉक डाऊन 17 मे नंतर पुढे सुरू रहाणार की संपणार यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.