वार्ताहर/ कुर्ली
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमधून निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील व अरिहंत उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी ग्रामविकास आघाडीच्या 5 उमेदवारांनी विजय मिळविला आहे. समविचारी आघाडीच्या माध्यमातून आप्पाचीवाडी परिसराच्या विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन या सदस्यांनी केले.
या निवडणुकीत वॉर्ड क्र. 2 मधून लक्ष्मण रामा आबणे यांनी 407, उज्ज्वला बाळासाहेब गारगोटे 279, आप्पासाहेब गणपती माने 327, वॉर्ड क्र. 3 मधून सुमित्रा शहाजी माने 188, कृष्णात महादेव पोटले 229 मते घेऊन ग्रा. पं. सदस्य म्हणून निवडून आले. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत आप्पाचीवाडी येथील 8 पैकी 5 जागांवर ग्रामविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.
मतदारांनी या निवडणुकीत आपणास बहुमताने निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहून पुढील पाच वर्षात आप्पाचीवाडी ग्रा. पं. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे मनोगत लक्ष्मण आबणे, उज्ज्वला गारगोटे, आप्पासाहेब माने, सुमित्रा माने, कृष्णात पोटले या नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी व्यक्त करून मतदारांचे आभार मानले.