वार्ताहर/ कोगनोळी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भोम पौर्णिमा यात्रेत परंपरेप्रमाणे फक्त धर्मिक विधी करावा, भाविकांनी गर्दी करु नये, यासह अन्य विषयावर ग्रामपंचायतीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक यांनी, गावात येणाऱया मुख्य मार्गावर नाके उभा करावेत, गावाबाहेरील लोकांना येण्यास बंदी घालावी, श्री. हालसिद्धनाथांच्या यात्रेत फक्त मानकरी व पुजारी यांनीच सहभाग घ्यावा, मंदीरामध्ये फक्त धार्मिक विधी करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार बी. एस. तळवार यांनी यात्रा काळात नागरिकांनी घ्यावयाची सुरक्षितता याबद्दल माहिती दिली. प्रारंभी ग्रामपंचायत विकास अधिकारी लक्ष्मण पारे यांनी स्वागत केले.या बैठकीस बाबुराव खोत, संजय शिंत्रे, श्रीनिवास पाटील, अमर शिंत्रे, के डी पाटील, बापू पुजारी, गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, ग्रामपंचायत प्रशासक डी.बी. सुमित्रा यांच्यासह मानकरी, पुजारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. लक्ष्मण आबणे यांनी आभार मानले.