प्रियंका वड्रा यांचा केजरीवालांवर मोठा शाब्दिक प्रहार
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी रविवारी पंजाबमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून निघालेला पक्ष आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्य विषयक संस्थांसाठी काहीच केलेले नाही. पक्षाकडून केवळ देखावा केला जातो. याचमुळे आम आदमी पक्ष आणि त्याच्या नेत्यांचे सत्य जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रियंका यांनी पंजाबच्या कोटकपुरा येथील सभेत बोलताना म्हटले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे सरकार केंद्र सरकारच्या सुचनांनुसार चालत होते. याचमुळे पक्षाने मुख्यमंत्री बदलल्याचे प्रियंका यांनी नमूद केले आहे. तर प्रियंका यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे कौतुक करत काँग्रेसने पंजाबमध्ये एक गरीब आणि दलितप मुख्यमंत्री निवडल्याचा दावा केला आहे. आम्ही पंजाबमध्ये पंजाबचा मुख्यमंत्री निवडला. पंजाबचे सरकार पंजाबमधून चालावे अशी आमची इच्छा आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास ते दिल्लीतून चालणार आहे. परंतु चन्नी सरकार पंजाबमधून चालणार असल्याचे विधान प्रियंका वड्रा यांनी केले आहे.
जाहिरातींच्या पक्षांपासून सावध रहा
सध्या पंजाबमध्ये दिल्ली मॉडेलबद्दल बोलले जात आहे. हे लोक दिल्लीतून आले असून ते पूर्वीच अपयशी ठरले आहेत. यापूर्वी एका गुजरात मॉडेलची मोठी चर्चा होती. ते कशाप्रकारे अयशस्वी ठरले हे लोक जाणतात. दिल्लीचे सत्य देखील यापेक्षा वेगळे नाही. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने काहीच केलेले नाही. भाजप आणि आप हे दोन्ही जाहिरातबाजी करणारे पक्ष आहेत. जाहिरातींमुळे लोकांचे भलं होणार नाही. लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारे सरकार आवश्यक असून असे सरकार केवळ काँग्रेसच देऊ शकते असे त्या म्हणाल्या.
100 दिवसांमध्ये उत्तम कार्य
पंजाबला एक नवे सरकार हवे असून ते काँग्रेसच देणार आहे. चन्नी सातत्याने चांगले काम करत आहेत. पंजाबच्या मजबुतीसाठी चन्नी यांना एक संधी द्या. चन्नी यांनी 100 दिवसांमध्ये उत्तम कार्य केले आहे. पाणी, वीज, सीव्हरेज, वीलबिल माफ, गोशाळांमध्ये वीज मोफत, मागास वर्गासाठी मोठय़ा प्रमाणावर कर्जे वितरित करण्यात आली आहेत. आता आम्ही महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ इच्छितो असे प्रियंका यांनी म्हटले आहे.