सोशल मिडियावर प्रचाराचा धुमाकुळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गोकुळसाठी जोडण्या सुरु झाल्या असून कोण कुणासोबत आघाडी करणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दोन्ही बाजुनी समाजमाध्यमांवर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेला `आपलं ठयलंय’ हा हॅस्टॅगने वादळ उडवून दिले होते. आता गोकुळच्या निवडणुकीत विरोधकांचे `गोपुळ उरलंय’ तर सत्ताधारी गटाकडून `आम्हाल पटलंय’, `गोकुळमध्ये चांगलंच चाललंय’ गोकुळमध्ये लयं भारी चाललंय…! या हॅस्टॅगने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे.
गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्याठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरु आहेत. आमदार पी. एन. पाटील यांना साकडे घातले आहे. दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये जिल्हा बँकेत बैठक झाली. जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली. आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांची मैत्री जगजाहीर असल्याने ही वरवरची चर्चा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महाडिक अशीच निवडणूक होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी- विरोधी गटाकडून प्रचार यंत्रणा धडाक्यात सुरु आहे. यातही सभासदांच्या काळजाला भिडण्याचा दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरु आहे. सोशल मिडियातील वेगवेगळ्या संकल्पना समाजमाध्यमातून पुढे आल्या आहेत.
गोकुळच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात विधान परिषद निवडणुकीपासून सुरु असलेला संघर्ष लोकसभा, दक्षिण विधानसभा व्हाया गोकुळ, राजाराममध्ये पोहचला. गोकुळच्या गत निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या आघाडीचा काही मताच्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर नोकरभरती, गाय दूध दर कपात, मल्टिस्टेट आदी मुद्दे कायपणे चर्चेत ठेवण्यात विरोधक आघाडीवर राहिले. मोर्चा, प्रतिमोर्चाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले, यातूच पालकमंत्री सतेज पाटील, धनंजय महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाडिक परिवाराला `आमचं ठरलंय’ हॅस्टॅगने मोठी किंमत मोजावी लागली.
या निवडणूकत आमचं ठरलंय हा सोशल मिडियावरील हॅस्टॅग प्रभावी ठरला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याची गंभीर दखल घेतली. `मी बी ध्यानात ठेवलंय’ असे नमुद करत भविष्यात गोकुळच्या राजकारणात काय होऊ शकते. याचे संकेत दिले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी उदयास आली आणि जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणेच बदलली. या आघाडीत अनेकांची कोंडी झाली. या परिस्थिती गोकुळची निवडणूक होत आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट नसले तरी सत्ताधारी संचालकांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. तर विरोधी आघाडी गोकुळ बजाव समितीचे प्रमुखांनीही तालुकानिहाय बैठका घेवून सत्ताधारी गटाचा कशा पद्धतीने चुकीचा कारभार सुरु आहे. हे पटवून दिले जात आहे. एकंदरीत जिल्ह्यात गोकुळच्या निमित्ताने हवा तापू लागली आहे.