मुंबई/प्रतिनिधी
अधिवेशनाच्या वेळी विधानसभा अध्यक्षांसमोर गोंधळ घातल्याने सोमवारी भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं. त्या निर्णयाचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. सोमवारी सरकारची वेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू होता. पण विरोधकांचं केलं तुका झालं माका असं झालं. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण तोच बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी, “बारा आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय; आम्ही त्या सभागृहात नव्हतो. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यांची अशी भूमिका आहे की, त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये. तसेच गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेमधून निलंबित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
१२ आमदारांच्या गैरवर्तनामुळे त्यांचं निलंबन झालेलं आहे. सभागृहात शिस्त पाळणे हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, त्यामुळेच निलंबन केलं. नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत, यूपी आणि बिहारमध्ये आपण सभागृहात दंगली होताना पाहिल्या आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. महाराष्ट्रात ही परंपरा पडू नये म्हणून हा निर्णय घेतला असेल. अशा प्रकारचं वर्तन होऊ नये म्हणून हा कठोर निर्णय घेतला असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.