कणकवली/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे राणेंना अटक केली. नंतर जामिनावर राणेंची सुटका झाली. यासर्व घडामोडीनंतर काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेली शिवसेना-भाजपामुळे थांबलेली नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. शुक्रवारी रत्नागिरीमध्ये जन आशीर्वाद यात्रा होती. यावेळी राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आज राणेंची यात्रा सिंधुदुर्गमध्ये होती. यावेळी राणेंनी पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी राणेंनी आमच्या सभेला सात आठ हजारांची गर्दी आणि शिवसेनेच्या शाखेसमोर ५३ माणसं असं म्हणत शिवसेनेनला टोला लगावला.
कालच्या रत्नागिरीच्या सभेत राणे यांनी अनेक खळबळजनक विधानं, गौप्यस्फोट केल्याने आज सिंधुदुर्गमध्ये राणे काय बॉम्ब फोडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं होतं. नेहमी प्रमाणे राणेंनी आजच्या सभेतही शिवसेनेवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, आज आमची सभा कणकवलीमध्ये आहे. तुफान गर्दी आहे, सात आठ हजार लोक जमले आहेत. आणि शिवसेनेच्या कार्यालयासमोर ५३ माणसं. जिल्ह्यातली किती? ५३ माणसं. ही अवस्था आहे. एक सांगतो, आमच्या विरोधात काहीही चालणार नाही, चालूही देणार नाही. आणि म्हणून आधी चांगला कारभार करा.” असा टोला शिवसेनेला लगावला आहे.