प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रत्येक देवाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आमच्या हातून चांगले काम व्हावं, लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाकडूनही समाजाची चांगली सेवा व्हावी, एवढंच मागणं मागत असतो. हेच मागणं आज करवीर निवासिनी अंबाबाईकडेही मागितले आहे. शिवाय कोविडच्या संकटातून भारतासह साऱया जगाची सुटका कर, अशीही देवीकडे प्रार्थना केली असल्याचे, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पर्यटन व पर्यावरण संदर्भात होणाऱया बैठकीसह विविध कामांच्या निमित्ताने मंत्री ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱयावर आले होते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ते अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, व युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे हे होते.
मंत्री ठाकरे हे अंबाबाई मंदिरात गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी स्वागत केले. त्यानंतर ठाकरे यांनी देवीच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक केला. यावेळी पुजाऱयांनी देवीचा प्रसाद म्हणून ठाकरे यांच्यासह राजेश क्षीरसागर यांनाही श्रीफळ, देवीचा साडी, गजरा व प्रसाद दिला. मंदिराच्या व्हरांडय़ातून आल्यानंतर त्यांनी साक्षी विनायकाचेही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. या दरम्यान, त्यांनी मनकर्णिका कुंडाचीही पाहणी केली. मंदिराबाहेर आल्यानंतर ते शिवसेना शहर कार्यालयाकडे रवाना झाले.
मंदिरात राजकीय स्टेटमेंट करणार नाही…
मंदिराबाहेर आल्यानंतर मंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यासंदर्भात मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असल्याबाबतची विचारणा केली असता मंत्री ठाकरे म्हणाले, मी अंबाबाई मंदिरात राजकीय स्टेटमेंट करणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधू. आणि सर्वात महत्वाचे चांगल्या विषयांवरही चर्चा करु, असेही मंत्री ठाकरे यांनी सांगितले.