मुंबई \ ऑनलाईन टीम
ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या ठरावाच्या निमित्ताने अध्यक्षांना अर्वाच्च भाषेत बोलणे, माईक ओढून घेणे, राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणे तसेच अध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे अशा प्रकारची वर्तवणुक केल्यासाठी जवळपास १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संमत करण्यात आला. एक वर्षांच्या कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आले. संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडलेल्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी निलंबनाची घोषणा केली. या निलंबनाला एकतर्फी असल्याचा उल्लेख करत तसेच लोकशाहीचा खून करण्यात आल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारवर हल्ला करतो म्हणून विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले.
ठराव संमत झाल्यानंतर फडणवीस चांगलेच संतापले. भाजपा आमदारांच्या निलंबनानंतर सभागृहात बोलताना म्हणाले,”याठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे. लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधीपक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही,” असा संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.
सभात्याग केल्यानंतर विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलाताना फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. आम्ही हे सरकार अपयशी ठरलं हे दाखवून दिलं. सरकारनं खोटे आरोप लावून १२ आमदारांना निलंबित केलं आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार. आत्तापर्यंत नेहमीच असे प्रकार घडले परंतु कुणी कधी निलंबित झालं नाही. एकाही भाजपाच्या सदस्यानं शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी बघितलंय, शिवसेनेचे सदस्य होते त्यांनी धक्काबुक्की केली. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीनं क्षमा मागितली व तो विषय संपवून बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी रचण्यात आली.सभात्याग