ऑनलाईन टीम / पुणे :
सर्व आमदारांना मुंबईत हक्काची घरं देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह सर्वसामान्य जनतेनेही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारवासारव केली आहे. मुंबईत आमदारांना मोफत घरं दिली जाणार नाहीत. त्या घरांची किंमत आकारली जाणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, आमदारांना मुंबईत कायमस्वरूपी घरं देण्यात येतील, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. आमदारांना घर देऊ, अशी घोषणा होती. पण मीडियाने आमदारांना मोफत घरं देणार, असे वृत्त प्रसिद्ध केले. पण कोणालाही मोफत घरं दिली जाणार नाहीत. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, त्यांना त्या जागेची किंमत, बांधकाम खर्च असे साधारण 70 लाख रुपये आकारण्यात येणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनीही ही बाब स्पष्ट केली आहे.
आमदारांकडून घराचे पैसे वसूल केल्यानंतरच त्यांना घराचा ताबा देण्यात येईल. या योजनेत मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, आता आमदारांच्या घरांवरुन निर्माण झालेला संभ्रमाचा धुरळा खाली बसण्याची चिन्हे आहेत.