मुजफ्फरनगर दंगल : योगी आदित्यनाथ सरकारकडून अर्ज
वृत्तसंस्था / लखनौ
भाजपचे फायरब्रँड नेते आणि आमदार संगीत सोम, केंद्रीय मंत्री संजीव बालियान, आमदार सुरेश राणा आणि भाजप नेते कपिल देव यांना दिलासा मिळणार आहे. 2013 मधील मुजफ्फरनगर दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी भाजप आमदारांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मुजफ्फरनगर दंगलीशी संबंधित आरोपी संगीत सोम, सुरेश राणा, कपिल देव आणि संजीव बालियान यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱयांच्या वतीने न्यायालयात गुरुवारी एक विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेत्यांच्या विरोधात सुरू असलेले खटले समाप्त करण्याची विनंती याद्वारे करण्यात आली आहे. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला असला तरीही यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. पुढील सुनावणीत हे खटले संपुष्टात आणले जाऊ शकतात, असे मानले जात आहे.
2013 मध्ये दंगल
2013 च्या मुजफ्फरनगर दंगलीशी संबंधित 70 न्यायालयीन खटले मागे घेण्याची प्रक्रिया योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पूर्वीच सुरू केली होती. मागील वर्षी सरकारने या दंगलीशी संबंधित 48 खटले मागे घेण्याची विनंती केली होती. मुजफ्फरपूर आणि शामली येथील सांप्रदायिक दंगलीत 63 जणांना जीव गमवावा लागला होता आणि 50 हजारांपेक्षा अधिक जण विस्थापित झाले होते. दंगलीत संगीत सोम आणि सुरेश राणा समवेत अनेक नेते आरोपी होते.