प्रतिनिधी /वास्को :
आमदार एलिना साल्ढाणा यांच्याप्रमाणेच वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही दक्षिण पश्चिम रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाविरूध्द प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आमदार आल्मेदा यांच्या वास्को मतदारसंघालाही या रेलमार्ग दुपदरीकरणाचा फटक बसणार आहे. त्यानी यापूर्वीही या प्रकल्पाच्या नकारात्मक गोष्टींवर भाष्य केलेले आहे.
आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रेलमार्ग विस्तारीकरणासंबंधी गुरूवारी रात्री दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात या प्रकल्पासंबंधी 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व हुबळी विभागीय रेल्वेच्या अधिकाऱयांसमवेत झालेल्या बैठकीत आपण उपस्थित केलेल्या मुद्दय़ांबाबत पुन्हा माहिती दिली.
कासावली, वेलसाव व इतर भागात रेलमार्ग दुपदरीकरणाला होणाऱया विरोधाचे आमदार आल्मेदा यांनी यापूर्वी समर्थन केलेले आहे. ते म्हणतात की, रेलमार्ग दुपदरीकरण प्रकल्पापासून स्थानिक लोकांना कोणता फायदा होणार आहे. प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास या प्रकल्पासाठी कोणाची जमीन ताब्यात घेण्यात येईल व त्यानंतर त्या जमीन मालकांचे काय करण्यात येईल. या प्रकल्पामुळे ज्या लोकांना झळ बसणार आहे, त्याची सविस्तर माहिती उपलब्ध आहे काय. सरकार किंवा रेल्वे या प्रकल्पामुळे नुकसान होणाऱया लोकांना नुकसान भरपाई देण्याचा विचार करीत आहे काय तसेच जर या प्रकल्पाचा फायदा स्थानिक लोकांना होणार नाही तर नक्की कोणाला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे असाही प्रश्न आपण सात वर्षांपूर्वी रेल्वे अधिकाऱयांसमोर उपस्थित केला होता असे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्पष्ट केले आहे.
आज जरी राज्य मंत्रीमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिलेली असली तरी आपण सात वर्षांपूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची रेल्वेने अद्यापही उत्तरे दिलेली नसल्याचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले आहे.