बहुजनातील सर्व घटकांशी संवाद साधण्याचा हेतू
प्रतिनिधी / आटपाडी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बहुजन समाजावर विविध प्रकारचा अन्याय केला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातील बहुजनातील सर्व घटकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेवुन ओबीसी आरक्षण, धनगर समाज आरक्षण, पदोन्नतीचा प्रश्न आदींबाबत चर्चा करून सरकारला धारेवर धरण्याच्या हेतुने भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारपासुन घोंगडी बैठकांचे आयोजन केले आहे.
पंढरपुर येथे २१ समाजांच्या घोंगडी बैठकीने राज्य दौऱ्याचा शुभारंभ होत आहे. महाविकास आघाडी सरकारने बहुजनांच्या प्रश्नांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण धनगर समाजाचे आरक्षण पदोन्नतीमधील आरक्षणाचा विषय यासह बहुजन समाजातील सर्व घटकांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अन्याय केला आहे. याबाबत राज्यभर घोंगडी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधतात त्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.