पंढरपूर / प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी भावनाविवष वातावरणात आ. भालके यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आ. भालके यांचे पुत्र भगिरथ यांनी मुखाग्नि दिला.
आ. भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आणण्यात आले. त्यानंतर शहरातील शिवाजी चौक, नगर प्रदक्षिणा, नामदेव पायरी याठिकाणी त्यांच्या पार्थिवाची अंत यात्रा काढण्यात आली. दुपारी 2 वाजेनंतर त्यांचे पार्थिव सरकोली येथे आणन्यात आले याठिकाणी असंख्य समर्थक कार्यकर्ते नागरिक यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास भालके यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु करण्यात आले. तत्पूर्वी शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आ.प्रशांत परिचारक, आ. संजयमामा शिंदे ,आ. यशवंत शिंदे , माजी आमदार दिपक साळुंखे ,जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपूते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदि यावेळी उपस्थित होते.