प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या दोन दिवसांत आमावस्येच्या भरतीवेळी समुद्राला आलेल्या उधाणाच्या अजस्त्र लाटांनी मिऱया बंधाऱयांचा अलावा-पाटीलवाडी येथील काही भाग ढासळला आहे. आमावस्य आणि पौर्णिमेच्या मिळून पुढील तीन महिन्यात 6 वेळा भरतीला सामोरे जाताना येथील संकट अधिक गडद होणार आहे.
मिऱया गावाच्या किनाऱयांवरील लोकवस्तीची संरक्षण होण्यासाठी तेथील किनाऱयावर कोटय़वधी रुपये खर्च करुन काही वर्षांपुर्वी धुप्रतिबंधक बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी हजारो टनी दगड टाकून बंधारा बांधण्यात आला. मात्र अल्पावधीतच अजस्त्र लाटांच्या तडाख्यांनी दगड ढासळू लागले आहेत. यंदा मोसमी पाऊस सुरु झाल्यानंतरच्या पहिल्याच आमावास्येला या बंधाऱयाला दणका बसला आहे.
शासनाने नवीन तंत्राच्या साह्याने मिऱया बंधारा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनातील टाळेबंदीत काही काळ बंधाऱयांचा प्रस्ताव अडकून पडला. गतवर्षी पावसाळ्यात वाहून गेलेल्या बंधाऱयाच्या ठिकाणी दगड, मातीची भर टाकण्यात आली आहे. सुमारे 90 लाख रुपये खर्च करुन काँक्रिंटची भिंतीही उभारलेली आहे. ती भिंती या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात किती टिकाव धरेल याबाबत आता प्रश्नचिन्ह उभे आहे. शनिवारी आलेल्या प्रचंड उधाणाने समुद्राचे पाणी जवळच असलेल्या घरांच्या आवारात घुसले होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थ भयभित झाले होते. रविवारी दुपारीही भरतीच्यावेळी मोठय़ा लाटांनी बंधारा ढासळला आहे. रविवारपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उधाणाचा जोर कमी होता.