सांगरूळ / प्रतिनिधी:
आमशी (ता. करवीर) गावामध्ये गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचे २८ रुग्ण सापडल्याने करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भांबरे व गट विकास अधिकारी जयवंत उगले यांनी गावास भेट दिली. ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य व गावातील राजकीय नेत्यांना बोलावून मार्गदर्शन केले.
गावामध्ये शुक्रवार दिनांक ३० एप्रिल ते रविवार दिनांक २ मे पर्यंत तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गावातील औषध दुकाने वगळता दूध संस्था, सेवा संस्था, सर्व दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील सर्व कुटुंबांचा सर्वे करून घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी उगले यांनी दिल्या.
ग्रामपंचायतीने गावामध्ये जंतुनाशक औषध फवारणी केली आहे. तसेच गावातील सर्व कुटुंबांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना दंड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या बैठकीला सरपंच उज्वला पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, सर्कल सुहास गोंधे, डी.एस.पाटील, आर. टी. पाटील,ए. के. पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, पोलीस पाटील लता पाटील, रामनाथ पाटील, कृष्णात पाटील, आरोग्य सेवक व सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक शिवाजी वाडकर उपस्थित होते.