3.5 किलोमिटरची काँक्रिटची पक्की संरक्षक भिंत उभारण्याचे आदेश
वार्ताहर/ मडकई
मडकई येथील आम्रेखाजन शेतीच्या बांधाला पडलेल्या भगदाडाची दखल घेऊन स्थानिक आमदार तथा वीजमंत्रा सुदिन ढवळीकर यांनी माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून बांधाच्या दुऊस्तीसाठी आर्थिक मदत दिली आहे. शनिवारी दुपारी ढवळीकर यांनी बांधाच्या दुरुस्तीकामाची पाहणी केली. यावेळी शेतकरी व सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते. जलस्रोत व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना काम वेळेत व चोख करण्याचे आदेश त्यांनी दिले.
गेल्या महिन्याभरापूर्वी बांधाला भगदाड पडल्याने शेतीत खारे पाणी घुसून यंदाचा हंगाम पाण्याखाली गेल्याची तक्रार शेतकरी, सरपंच व पंचसदस्यांनी केली होती. शेतकरी कुळ संघटना समितीने हिशेबात अफरातफर केल्याची माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांना दिली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांच्या अडचणींवर मात केली जाईल. तसेच हिशोबात घोळ झाल्यास त्याची चौकशी निश्चितच होणार आहे. फोंड्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना जुन्या समितीला तात्पुरते बाजूला ठेऊन, दुरुस्तीकाम होईपर्यंत नवीन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांची नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. दुऊस्तीसाठी लागणारा सर्व खर्च माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून मिथील ढवळीकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने होडीत चिखल आणून साधारणपणे 25 दिवस राबून भगदाड बुजविले आहे, असे प्रसार माध्यमांसमोर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
आम्रेखाजन शेतीच्या बाहेरुन जुवारी नदीला लागून 3.5 किलो मिटरची काँक्रिटची पक्की संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश जलस्रोत व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरती पासून संरक्षण मिळवण्यासाठी 60 सेंटी मिटरची उंची असेल. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर आतील काम शेतकऱ्यांनी हातात घ्यावे. कमकुवत झालेल्या ठिकाणच्या बांधाची ताकद वाढविणे गरजेचे आहे. त्यांना हे काम करण्यास अडचणी येत असल्यास त्यांनी जलस्रोत व कृषी खात्याची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंडई येथील चिखलखाण्याची परिस्थिती याहून वेगळी नसल्याचे मंत्री ढवळीकर म्हणाले. पाण्यात जिलेटीन टाकून मासळी मारण्याच्या प्रकार तेथे वाढले आहेत. मासळी मारण्यासाठी जीलेटीनचा वापर करणे हे अत्यंत घातक आहे. वेळीच हे बंद न झाल्यास बांधाला अशीच भगदाडे पडून शेतीची नुकसानी होत राहील. वारंवार जिलेटीनचे स्फोट घडवून आणण्याच्या प्रकारामुळे कुंडईचे चिखलखाण्याची पडझड होत चालली आहे. ऊ. 2.50 कोटी खर्चून हे ही काम हाती घेण्यात आले आहे. येथील मासळी विकून त्यांतील नफा हा शेतकऱ्यांनाच मिळवून दिला जाईल, असेही मंत्री ढवळीकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास गावडे यांनी मंत्री सुदिन ढवळीकर व ट्रस्टचे ऋण व्यक्त करुन यापुढे शेतीची सर्व कामे सर्वांना विश्वासात घेऊन केली जातील असे सांगितले.
माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथील ढवळीकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ऊ. 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मडकई पंचायतीचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, पंचसदस्य विशांत नाईक, बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते अरविंद फडते, शेतकरी संघटनेचे नवीन अध्यक्ष मंगलदास गावडे, माजी पंचसदस्य योगेश गावडे, शेतकरी प्रकाश नाईक तसेच अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.