बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार – सरकारच्या मौनावर सुब्रमण्यम यांचा संताप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारासंबंधी भारतातील राजकीय वर्तुळात विचित्र मौन आहे. सत्तारुढ भाजपचे नेते स्वतःच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वानी यांनी भारत आता मालदीवलाही घाबरणार का असा उपरोधिक प्रश्न करत केंद्र सरकारच्या भूमिकेला लक्ष्य केले आहे.
स्वामी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या ‘नरसंहारा’वर स्वतःची नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. भाजप सरकार बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराच्या वाढत्या घटनांच्या मुद्दय़ांवर आवाज का उठवत नाही? आम्ही बांगलादेशला घाबरतो का? लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर आम्ही अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जामुळे बिथरलो आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करू इच्छितो. भविष्यात आम्ही मालदीवलाही घाबरणार आहोत का असे प्रश्नार्थक विधान स्वामी यांनी केले आहे.
बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान सुरू झालेल्या हिंदूविरोधी हिंसाचार अद्याप शमलेला नाही. अनेक हिंदूंची घरे पेटवून देण्यात आली आहेत. बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी भारतातील कथित उदारमतवादी वर्गाला याप्रकरणी गंभीर प्रश्न विचारला आहे. जे लोक भारतात अल्पसंख्याकांचे समर्थन करतात तेच लोक बांगलादेशच्या अल्पसंख्याकांचे समर्थन करण्याप्रकरणी माझा द्वेष करतात असे नसरीन यांनी म्हटले आहे. तर बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले भारतीय राज्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मौनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमेरिकेकडून निंदा
भारताने मौन राखले असले तरीही बांगलादेशातील या घटनांची अमेरिकेने निंदा केली आहे. हिंदू मंदिरे आणि घरांवर झालेल्या हिंसक हल्ल्यांची आम्ही निंदा करतो. आमच्या संवेदना हिंदू समुदायासोबत आहेत. आम्ही याप्रकरणी पूर्ण चौकशीची विनंती अधिकाऱयांना करतो. धर्म किंवा श्रद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य हा मानवाधिकार असल्याचे अमेरिकेच्या विदेशमंत्रालयाने म्हटले आहे.