रयत संघटनेचा जिल्हा प्रशासनाला इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररीत्या सुरू करण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात आला आहे. हे काम आम्ही पुन्हा बंद पाडू, असा इशारा शेतकऱयांनी दिला. याचबरोबर अनगोळ येथील सुपीक जमीन बुडाने घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवावा. कणबर्गी येथीलही जमीन 61 क्रमांक स्कीमसाठी घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या विरोधात शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
यावेळी शेतकऱयांच्या विरोधात काम करणाऱया केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना बेकायदेशीररीत्या काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱयांवर एक प्रकारे दडपशाही सुरू आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असताना काम करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. तेव्हा हे काम पुन्हा आम्ही बंद पाडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अनगोळ येथील तिबारपिकी सुपीक जमीन हिसकावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो तातडीने थांबवावा अन्यथा विष पिऊन आम्ही आत्महत्या करू, असा इशारा देण्यात आला आहे. अनगोळ येथे शेती व्यवसायावरच अवलंबून राहणारी कुटुंबे आहेत. या जमिनी गेल्या तर आम्ही जगू कसे? असा सवाल करण्यात आला आहे. 62 क्रमांक योजनेसाठी ही जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही कदापीही जमीन देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
या परिसरातील शेतकऱयांची जमीन हिसकावून घेऊन शेतकऱयांना देशोधडीला लावण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते थांबवा. अन्यथा शेतकरी आपला हिसका दाखवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष रवी सिद्धमण्णावर, राजू मरवे, शंकर जाधव, विक्रांत जाधव, सुभाष लाड, अर्जुन बुद्रुक, रवी पाटील, पिराजी सोमनाचे, मनोहर सोमनाचे, नंदकुमार मुतकेकर, अशोक हुल्लोळी, सागर सोमनाचे, मदन बुद्रुक, उमेश सोमनाचे, सदानंद पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ओव्हरब्रिजचे काम पुन्हा बंद पाडले
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन शेतकऱयांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अलारवाड क्रॉसजवळ सुरू असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामाकडे मोर्चा वळविला. त्यानंतर तेथील काम पुन्हा शेतकऱयांनी बंद पाडले. कामगार काम करत होते. मात्र त्यांना कोणत्याच प्रकारची परवानगी नव्हती. याबाबत विचारले असता कंत्राटदाराला विचारा, असे त्या कामगारांनी सांगितले. त्यांना फोन लावून याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र कंत्राटदारांनी फोनच उचलला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी काम बंद पाडले.