वार्ताहर / खटाव
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार प्रतिकूल परिस्थिती असतानाही चांगले काम करत आहे. यापुढे पण लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता देण्यासाठी सरकार आग्रही आहे. तर जिहे कठापूरची मान्यता आम्ही दिली आहे. आम्ही काम करतो त्यामुळे ईडीकडे जायला जमत नाही. साताऱयाची जिल्हा बँक ही चांगली चालली असून यापुढेही ती चांगल्याच माणसांच्या हातात हवी. तसेच आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, नगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱयांना वाव देणार असून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला.
खटाव (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, सातारा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुनिल माने, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार लोकांच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत. त्यासाठी लवकरच सातारा मेडिकल कॉलेजचे काम सुरू करणार आहोत. तसेच रस्ते, कारखानदारी, शेती, शिक्षण यात बदल करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. जिहे-कठापूरसाठी आम्ही मान्यता दिली आहे. तसेच जिह्यातील उरमोडी, तारळी आणि धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावत आहोत. कारखानदारीबद्दल चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही कामात असतो त्यामुळे उठसूट ईडीकडे जायला जमत नाही. काम करा पण राजकारण करू नका असा इशारा दिला. आम्ही मराठवाडा, विदर्भावर अन्याय केला नाही.
सातारा जिल्हा बँक चांगले काम करत आहे. त्यामुळे जिल्हा बँक चांगल्या माणसांच्या हातात असायला पाहिजे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत जात-पात, नाती-गोती न पाहता नवीन चेहऱयांना संधी देणार आहे. विधी व न्याय खात्याला सोबत घेत आगामी नागपूर अधिवेशनात बैलगाडी शर्यतीबाबत मार्ग काढणार आहे. तसेच ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात आग्रही राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा विकास कामांवर परिणाम झाला. उद्योगधंदे बंद असून महसूलात वाढ झाली नाही. पण उरमोडी, तारळी, उत्तरमांड, टेंभू या योजनांना आघाडी सरकारने गती दिली आहे.
आ. शशिकांत शिंदे यांनी माझा पराभव झाला मी कमी पडलो पण पक्षाने पुन्हा संधी दिली असल्याचे सांगत महाविकास आघाडी राज्यात मजबूत झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपला बाहेर करण्याचा निर्णय घ्या असे सांगितले. तर जरंडेश्वर साखर कारखाना सुरू रहायला पाहिजे तरच शेतकऱयांना न्याय मिळेल असे सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाने खटावला कायमच झुकते माप दिले आहे. त्यामुळे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. जिहे-कठापूर योजनेला उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच गती व निधी दिला असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, सतीश चव्हाण, बाळासाहेब पाटील यांचा निवडीबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी सुरेंद्र गुदगे, मंगेश धुमाळ, मानसिंग जगदाळे, शहाजी क्षीरसागर, बंडा गोडसे, तेजस शिंदे, इंदिरा घार्गे, सुनिता कचरे, बाळासाहेब सोळस्कर, ब्रम्हा पैलवान, वनिता गोरे, जयश्री कदम, शिवाजी सर्वगोड, नितीन पाटील, उपनगराध्यक्ष नंदा बर्गे, मनोज देशमुख, रमेश शिंदे, रसूल मुल्ला, मनोहर लावंड, किशोर डंगारे, दिलीप जाधव, मुगूटराव पवार, किरण राऊत, संजय शहा, जयदीप शिंदे, सुरज देशमुख, सतीश शिंदे यांची उपस्थिती होती.
उपस्थित कार्यकर्त्यांना संयोजकांनी मास्कचे वाटप केले. सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. तर आभार सागर साळुंखे यांनी मानले.