मागच्या पिढीपेक्षा नवीन असलो तरी मुलां-नातवंडांच्या तुलनेत आम्ही जुनाट माणसं आहोत हे कबूल करायला हवं. जे आहे ते आहे. कोणे एके काळी छपाईचे तंत्र महाग होते. ऊठसूट कोणी छापखान्यात जात नसे. पत्रव्यवहार टाईपरायटरवर होई. लेखक आपले लेखन हाताने करीत. फार मोठे लेखक लेखनिक ठेवत किंवा टाईपरायटरवर स्वतः टाईप करीत.
ऑफसेट छपाईचे तंत्र आले. एका संपादकांनी लेखकांना पत्रे लिहून दिवाळी अंकासाठी लेखन मागितले. ही पत्रे डीटीपी पद्धतीने टाईप आणि पिंट करून लेखकांना पाठवली होती. तेव्हा (हे नवे तंत्रज्ञान ठाऊक नसलेले) जुन्या पिढीतले एक लेखक अतिशय चकित झाले आणि भारावून गेलेल्या अवस्थेत त्यांनी संपादकांना उत्तर पाठवले की मला लेखन मागण्यासाठी तुम्ही पत्र छापलंत, एवढा खर्च केलात हे पाहून अतिशय संतोष झाला आहे…वगैरे, वगैरे.
गेली दोन दशके भारत देश झपाटय़ाने डिजिटल होतो आहे. एलआयसीचे हप्ते कोणालाही कोणत्याही कचेरीत किंवा चौकाचौकात उभारलेल्या प्रीमियम पॉइंटवर भरता येतात किंवा बँकेतून ट्रान्सफर करता येतात, एटीएम नावाचे रोख रक्कम देणारे यंत्र रस्त्यावर उभे असते, मोबाईलच्या सहाय्याने एकमेकांना पैसे देता-घेता येतात. हे सगळे आमच्या पिढीला ‘ऐकावं ते नवलच’ आहे.
आमच्या घराजवळ एक सहकारी चिमुकली बँक आहे. अगदी छोटी बँक असल्याने आम्ही तिथे पैसे ठेवतो. एखादी गोष्ट समजली नाही तर निःसंकोचपणे विचारतो. तिथे घडलेला एक मजेदार प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी पेन्शन घ्यायला बँकेत गेलो होतो. पेन्शन घेतली आणि आठवलं की माझं चेकबुक संपलंय. मग घरी गेलो त्या चेकबुकमध्ये असलेला चेकबुकसाठीचा अर्ज सही करून बँकेत नेऊन दिला. त्या वेळी बँक बंद व्हायची वेळ आली होती. अर्ज देताना मी भीत भीत विचारलं, “नवीन चेकबुक केव्हा मिळेल?’’
“उद्या सकाळी या,’’ ती मुलगी शांतपणे म्हणाली.
मला शंका आली. पण तरी खात्री करून घेण्यासाठी दुसऱया दिवशी सकाळी गेलो. तर खरोखरच चेकबुक मिळालं. प्रत्येक चेकवर माझं नाव छापलेलं होतं. एका रात्रीत कसं काय शक्मय झालं असेल? व्यवस्थापकांना विचारलं. त्यांनी ते तंत्र सांगितलं. पण आमच्या ‘डोक्मयावरून गेलं’.
काय करणार? आम्ही जुनाट माणसं!