मुंबई/प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी नाना पटोले यांना महाराष्ट्रातील पप्पू म्हणून संबोधले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना आणि मला काहीही म्हटलं तरी आम्ही मात्र भाजप नेत्यांना चंपा आणि टरबुज्या म्हणणार नाही असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांना तेलकट थापा मारुन ओबीसी आरक्षणावरुन समाजाच्या फसवणूकीचे पाप लपवता येणार नाही अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान राज्यात सत्ता गेल्यापासून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी केंद्राच्या मदतीनं महाराष्ट्रातील राज्य सरकारला अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. यामुळे भाजप नेते सैरभैर झाले असून त्यांचा तोल ढासळत चालला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही. असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिल्लीत एक पप्पू आहे, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसूट ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात त्यांनी बोचरी टीका केली होती. पुण्यातील पत्रकार परिषदेत पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ‘डबे’ बदलून उपयोग नाही, तर ‘इंजिन’ बदलण्याची गरज आहे, अशा शब्दात पंतप्रधानांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी पटोले यांचा पप्पू असा उल्लेख केला.