ऑनलाइन टीम / पुणे :
आत्ता आलेलं सरकार हे टेस्ट ट्यूब बेबी नाही, व्यवस्थित जन्माला घातलेलं आहे. भाजपावाले शब्द पाळणार नाहीत, त्याची मला खात्रीच होती. त्यामुळे महाआघाडीचे सरकार कोसळणार नाही, आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणार असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांची दिलखुलास मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेक मुद्यांवर त्यांनी उत्तर दिली.
आज जे सरकार स्थापन झालं आहे त्याला कुणीही खिचडी म्हणत नाही. त्याला सरकार म्हणतात. कारण त्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन शरद पवार करतात, असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.
ते म्हणाले, मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे. समोर कोणीही असलं तरी मी कुणाला घाबरत नाही. मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे. असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले याचा आम्हाला अभिमानच होता. मात्र, पुढे सगळं बदलत गेलं. ‘माझं ते माझं. तुझं ते माझ्या बापाचं’ हा राजकारणातील एक स्वभाव आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला हाणला.