प्रतिनिधी/ पणजी
आयआयटी प्रकल्प कुडचडेत आणल्यास आपण त्याचे स्वागत करू. मतदारसंघातील लोकांना समजावून मन वळविण्याचे कामही आपण करू, असे प्रतिपादन कुडचडेचे आमदार तथा कायदामंत्री निलेश काब्राल यांनी केले.
पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयआयटी प्रकल्प कुडचडेत आणावा यासाठी यापूर्वी आपणही प्रयत्न केले होते. सुमारे 11 लाख चौ. मी. जमीन उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शविली होती. परंतु काणकोण तसेच सांगे येथील लोकांनी या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर तो थेट मेळावलीत नेण्याची तयारी सरकारने केली. त्यामुळे आपला प्रस्ताव मागे पडला.
आता सदर प्रकल्पास मेळावलीतूनही जोरदार विरोध झाला व स्थानिक आमदारांनी लोकांसोबत राहण्याची तयारी दर्शवत त्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे सदर प्रकल्प तेथे होईल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. अशावेळी तो प्रकल्प आपल्या मतदारसंघात आणल्यास त्याचे स्वागतच करू, असे काब्राल यांनी सांगितले.
दरम्यान, वीज बिलांची थकबाकी ठेवलेल्या ग्राहकांसाठी लागू करण्यात आलेल्या एकरकमी परतफेड योजनेस नियोजित वेळेत लोकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे योजनेची मुदत वाढवून देण्यात आली. त्यासाठी आत्ता कुठे लोक पुढे येऊ लागले आहेत. मात्र याही निर्धारित मुदतीत परतफेड करण्यात हयगय केल्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे काब्राल यांनी सांगितले. यापुढे अशा ग्राहकांची वीज जोडणी थेट तोडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात सुमारे 7 लाख वीज ग्राहक आहेत. त्यातील सुमारे 1.40 लाख ग्राहक वीज बिले थकित ठेवतात. अशा ग्राहकांसाठी ही एकरकमी परतफेड योजना लागू केली होती, अशी माहितीही काब्राल यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करावा या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार दि. 19 जानेवारी रोजी आपण काणकोण मतदारसंघ दौरा करणार आहे. या दौऱयात काणकोण पालिकेसह आगोंद, श्रीस्थळ, गावडोंगरी, खोतीगाव, पैंगिणी, लोलये या पंचायतींना भेटी देऊन लोकांची गाऱहाणी ऐकणार आहे. त्यावेळी स्थानिक आमदार सोबत राहणार आहेत.