वाळपई प्रतिनिधी
गुळेली-सत्तरी याठिकाणी होऊ घातलेल्या वादग्रस्त आयआयटी प्रकल्पाकरिता संपादीत केलेल्या जागेला कुंपण घालण्यासाठी आलेला ना हरकत दाखल्याचा प्रस्ताव काल मंगळवारी शेळ-मेळावली ग्रामपंचायतीच्या बैठकीत फेटाळल्याने आंदोलकांनी एकच जल्लोष केला. तथापि या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आता यु टर्न घेण्याच्या तयारीत असावे किंवा अन्य काही गडबड आहे हे कळण्यास मार्ग नसला तरी देखील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या ताब्यात असलेल्या या पंचायत मंडळाने घेतलेल्या या धाडसी निर्णयमागे ‘बोलविता धनी’ कोण, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे.
आम्ही केलेल्या आंदोलनाचा पहिला अध्याय आम्ही जिंकलेला असून यापुढेसुद्धा अशाच प्रकारच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर आयआयटी प्रकल्प या भागातून हद्दपार करू, असा दावा आंदोलकांनी केलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पासंदर्भात मौनव्रत धारण करणाऱया पंचायतीने मंगळवारी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्मयता वर्तविली जात असून येणाऱया काळात या संदर्भात खरे चित्र समोर येणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
सकाळपासूनच पंचायतीसमोर जमले आंदोलक
काल मंगळवारी पंचायतीची मासिक बैठक निश्चित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयआयटी प्रकल्पाच्या सभोवताली कुंपणाच्या बांधकामासाठी ना हरकत (एनओसी) देण्यासंदर्भात प्रस्ताव चर्चेसाठी येणार होता. याची कुणकुण स्थानिकांना लागली होती. सकाळपासूनच पंचायतीच्या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे ग्रामस्थांनी काढला मूकमोर्चा
अगोदर ठरल्याप्रमाणे आयआयटी विरोधकांनी मंगळवारी पंचायतीवर मूक मोर्चा नेला. पंचायतीच्या कार्यालयासमोर ठाण मांडून आपले शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलक या परिसरामध्ये जमा होऊ लागले होते. मात्र कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेने आंदोलकांनी आपला विरोध पंचायतीला दाखवण्याचा प्रयत्न केला.
पंच सदस्यांनी जीवाच्या भितीमुळे प्रस्तावाला केला विरोध
पंचायतीची मासिक बैठक सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच अपूर्वा च्यारी होत्या. अन्य विषयावर चर्चा करण्यात आल्यानंतर आयआयटी कुंपणाच्या ना हरकत दाखल्याचा प्रस्ताव चर्चेसाठी घेण्यात आला असता त्याला सर्वांनी विरोध करून फेटाळण्यात आला. पंच सभासदांनी आपल्या जीवाला धोका असल्यामुळे प्रस्तावाला आम्ही समर्थन देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पासंदर्भात सरकारला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर जरूर घ्यावा, मात्र याची जबाबदारी पंचायतीवर नको, अशी मते मांडून प्रस्ताव फेटाळण्यात आला.
पंचायतीकडे कागदोपत्री व्यवहार नाही : सरपंच
प्रस्ताव फेटाळल्यानंतर सरपंच अपूर्वा च्यारी यांनी पत्रकारांना सांगितले की या प्रकल्पासंदर्भात पंचायतीकडे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार झालेला नाही. स्थानिकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रकल्पाला विरोध होत आहे. काही पंच सभासदांवर दबाव येत असल्यामुळे प्रत्येकाने याला विरोध केल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. बैठकीस सर्व पंच उपस्थित होते. नितेश गावडे, अनिल गावडे, अस्मिता मेळेकर, अर्जुन मेळेकर, विनोद गावकर, विठ्ठल कासकर, सचिव मुला वरक यांचा समावेश होता.
आंदोलनाचे पुढील टप्पे निश्चित पार करणार : सावर्डेकर
पंचायत बैठकीमध्ये प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती आंदोलकांना मिळाल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. आंदोलकांच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शशिकांत सावर्डेकर यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना पंचायतीने जरी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी येणाऱया काळात या प्रकल्पासंदर्भातील आंदोलनात पुढील टप्पे निश्चित प्रमाणात पार केले जाणार आहेत, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.