प्रतिनिधी/ बेळगाव
आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. सध्या आयुर्वेदिक डॉक्टर रुग्णांवर पाईल्ससारख्या विकारावर किरकोळ शस्त्रक्रिया करतात. अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया वगळता इतर गंभीर अशा विकारांवरील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए )केली आहे.
यासंदर्भात आयएमएच्या बेळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकाऱयांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून सरकारने आपला निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सेक्रेटरी डॉ. देवेगौडा यांच्या नेतृत्त्वाखाली डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यावेळी डॉ. विजयकुमार, डॉ. कौजलगी, डॉ. बी. जी. हलगेकर, डॉ. गोदी, डॉ. शशिकांत कुलगोड, डॉ. अनगोळ, डॉ. भट आदी उपस्थित होते.