जिल्हाधिकाऱयांतर्फे विविध मागण्यांसाठी पंतप्रधानांना पाठविले पत्र : डॉक्टरांनी काळय़ा फिती बांधून बजावली सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
डॉक्टरांवरील होणारे हल्ले चिंताजनक आहेत. अशा हल्ल्यांमुळे त्यांना शारीरिक इजा होतेच. परंतु त्यांचे स्वास्थ्यही हरवते. हे हल्ले थोपविण्यासाठी कडक उपाययोजना करावी. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या अहोरात्र सेवेची जाणिव सरकारने ठेवावी. कोरोनाबाधितांवर उपचार करताना मृत झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने 18 जून रोजी आयएमए ‘नॅशनल प्रोटेस्ट डे’ आचरणात आणला. याचाच एक भाग म्हणून डॉक्टरांनी काळय़ा फिती बांधून सेवा बजावली.
याबाबत आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्र पाठविले असून त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. आयएमए ही आधुनिक वैद्यकीय सेवा बजाविणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. दिग्गज अशा डॉक्टरांनी या संस्थेची स्थापना केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. मात्र आयएमएच्या अनेक मागण्यांकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी विधेयक संमत झाले. त्यानुसार हल्लेखोरांना दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करून काही मंत्र्यांच्या सूचनेवरून ती रद्द केली. मात्र त्यामुळे डॉक्टरांवर आणखीन हल्ले होत असून अशा क्रूरकृत्यांसाठी हल्लेखोरांना त्वरित शिक्षा होणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे अनेक डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू झाली आहे. परंतु आतापर्यंत 754 डॉक्टरांचा मृत्यू झाला असून फक्त 168 डॉक्टरांच्या कुटुंबीयांनीच यासाठी अर्ज केले आहेत. अन्य डॉक्टरांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन सरकारने त्यांना सुद्धा ही मदत देणे आवश्यक आहे. लसीकरण हाच कोरोनावर उपाय आहे. परंतु आतापर्यंत सर्वांचे लसीकरण होवू शकले नाही. सरकारने 18 वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस द्यावी व 50 टक्के कोटा खासगी हॉस्पिटल्सना द्यावा. त्याचा सर्वांनाच फायदा होवू शकतो.
कोविड-19 मध्ये कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर सेवा बजावत आहेत. या शिवाय आरोग्य सेवकांनी अखंड काम केले आहे. सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी आयएमए सरकारच्या बाजुने ठाम उभी आहे. लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरविणाऱयांच्या विरोधात सरकार उभे राहिले यासाठी आम्ही सरकारचे ऋणी आहोत. कोरोनाच्या मध्यावधीमध्ये देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले झाले. आसाममध्ये महिला डॉक्टरांवर हल्ले झाले. हे अत्यंत दुर्दैव होय, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोविडच्या पाठोपाठ ब्लॅक फंगसचे संकट उद्भवले आहे. त्यासाठीची औषधे लवकर उपलब्ध करावी व पोस्ट कोविडच्या अभ्यासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. आयएमए बेळगावचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. देवेगौडा आणि सर्व डॉक्टरांच्यावतीने हे पत्र पाठविण्यात आले आहे.