एआयएफएफचा निर्णय, अनुक्रमे गोवा व कोलकात्यात होणार आयोजन
वृत्तसंस्था/ चेन्नई
पुढील मोसमात होणाऱया आयएसएल व आय लीग फुटबॉल स्पर्धा एकाच पेंद्रावर आयोजित केल्या जाणार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने सोमवारी जाहीर केले. आयएसएल स्पर्धा गोव्यात होण्याची शक्यता असून 21 नोव्हेंबर रोजी त्याची सुरुवात होईल. त्यानंतर आय लीग स्पर्धा दोन आठवडय़ांनी कोलकात्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविले जाणार असल्याने प्रेक्षकांना प्रवेशबंदी असेल, असे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले. ‘कोरोना महामारीच्या प्रकोपाचा विचार करून आम्ही या स्पर्धा एकाच ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी एकाच ठिकाणी अनेक मैदानांची सुविधा असणाऱया केंद्रांची गरज होती आणि अशी सुविधा गोवा व कोलकाता येथे उपलब्ध असल्याने आम्ही त्यांची निवड केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोलकात्यात होणार असल्याने त्याच्या तीन महिने आधी सॉल्टलेक स्टेडियम उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आयएसएल कोलकात्यात आयोजित करण्याचा विचार सोडून देण्यात आला. यू-17 विश्वचषक स्पर्धा सुरू असताना लीगमधील सामनेही सुरू राहणार आहेत. स्पर्धेच्या प्रारंभीच्या टप्प्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही,’ असे दास यांनी बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलताना सांगितले.
एकाच ठिकाणी स्पर्धा घेतली जाणार असल्याने अनेक समस्या सुटणार असल्याचे दास यांना वाटते. ‘खेळाडू, साहाय्यक स्टाफ, रेफरी, सामनाधिकारी यांचा शक्यता तितका कमी प्रवास व्हावा, असा आमचा उद्देश आहे. तो यामुळे साध्य होणार आहे. याशिवाय सर्व संघांना एक किंवा दोन हॉटेल्समध्येच ठेवले जाणार असल्याने कोव्हिड 19 चाचण्या नियमितपणे घेणे सोयीचे होणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
मोहन बगान एटीकेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर आयएसएलमध्ये खेळणार असल्याने ईस्ट बंगाल संघाच्या भवितव्याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत. देशातील अव्वल लीगमध्ये खेळण्याची इच्छा असेल तर ईस्ट बंगालने भक्कम आर्थिक योजना आखण्यासाठी मोहन बगानसारखी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे दास यांना वाटते. क्लब परवान्याचे निकष 15 जुलैपासून खुले केले जाणार असून क्वेस हे ईस्ट बंगालचे अजूनही पुरस्कर्ते आहेत. त्यांना येत्या काही महिन्यात नवे भक्कम पुरस्कर्ते शोधण्याची गरज लागणार आहे, असे दास म्हणाले.
फुटबॉल शिबिर भुवनेश्वरमध्ये
कोरोनाच्या ब्रेकनंतर भारतात फुटबॉलची सुरुवात विश्वचषक पात्रता लढतीने केली जाणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भुवनेश्वरमध्ये भारताचा हा सामना कतारविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची भारतीय संघाचे सहा आठवडय़ांचे शिबिर युरोपमध्ये घेण्याची इच्छा होती. पण दास यांनी ती शक्यता फेटाळून लावली. भुवनेश्वरमध्येच शिबिर घेण्यात येईल. तसे आम्ही ओडिशा सरकारला कळविले आहे. ऑगस्टच्या तिसऱया आठवडय़ात त्याची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, असे दास यांनी स्पष्ट केले.