99.75 टक्के गुणांसह 18 जणांना प्रथम क्रमांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘सीआयएससीई’ने जाहीर केलेल्या आयएससी (इंडियन स्कूल सर्टिफिकेट) बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यावषी 99.38 टक्के निकाल लागला असून त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.52 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.26 टक्के आहे. यंदा केरळमधील सर्वाधिक 99.96 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
अखिल भारतीय रँकमध्ये एकूण 18 विद्यार्थ्यांनी 99.75 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. पहिले तिन्ही क्रमांक मुलींचेच आहेत. पहिल्या 18 टॉपर्समध्ये उत्तर प्रदेशातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. तसेच एक हरियाणाचा, एक महाराष्ट्राचा, तीन तामिळनाडूचे आणि सहा पश्चिम बंगालमधील आहेत. गुणवत्ता यादीत एकूण 154 विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. यावषी एकूण 96 हजार 940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 51 हजार 142 मुले आणि 45 हजार 798 मुलींचा समावेश आहे.
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (सीआयएससीई) रविवारी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा सविस्तर निकाल अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी हा निकाल ऑनलाईन पद्धतीने किंवा संबंधित शाळांमध्ये पाहू शकतात. सीआयएससीईने 17 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर बोर्डाने निकालाची तारीख आणि वेळेची माहिती दिली होती. यंदा दहावीत 99.97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.