वृत्तसंस्था/ बेंगळूर
2022 आर्थिक वर्षाच्या दुसऱया सहा महिन्याच्या कालावधीत आयटी उद्योग आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांकडून 4 लाख 50 हजार जणांना नव्याने भरती करून घेतले जाणार असल्याची माहिती नुकतीच उपलब्ध झाली आहे.
आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेमध्ये वरील भरतीचे प्रमाणे 12 टक्के अधिक असणार आहे. आयटी क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांकडून ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत 4 लाख 50 हजार जणांची नव्याने विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. डिजिटल व्यवहारांना सर्वत्रच व्यवहारांमध्ये प्रतिसाद लाभत असल्या कारणाने या क्षेत्रातील तज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. नव्या शिकावू उमेदवारांसह अनुभवी व्यावसायिकांनाही विविध कंपन्यांकडून भरतीची संधी उपलब्ध केली जाणार आहे.
टीसीएस आघाडीवर
आयटी क्षेत्रात भरती करण्यात टीसीएस ही कंपनी आघाडीवर राहिली आहे. कंपनीने 77 हजार जणांना आजवर भरती करून घेतलं आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत आयटी सेवा संस्थांनी भारतामध्ये अडीच लाख नव्या प्रेशर्सना नोकरीत सामावून घेतले आहे. यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही सहभाग आहे. यामध्ये टीसीएस कंपनीने सर्वाधिक 77 हजार जणांना नोकरीची संधी देऊ केली आहे. या पाठोपाठ इन्फोसिस (45 हजार), कॉनिझेंट (45 हजार) व एचसीएल टेक (22 हजार) यांनी भरतीवर भर दिला होता.