वृत्तसंस्था /कोलकत्ता :
भारतात तिसऱया नंबरवर असणारी पॅकेज खाद्य क्षेत्रातील कंपनी आयटीसीच्या व्यवसायाने 2019-20 आर्थिक वर्षामध्ये 10 हजार कोटींचा विक्रीचा टप्पा पार केला आहे. ब्रिटानिया कंपनी या विक्रीच्या स्पर्धेमध्ये दुसऱया नंबरवर राहिली आहे. आयटीसी अंदाजे 600 कोटी रुपयांच्या तफावतीने ब्रिटानियापेक्षा मागे आहे. दुसरीकडे नेस्ले इंडियाने व्यवसायात पहिला नंबर प्राप्त करत वर्चस्व राखलं आहे.
आयटीसीअंतर्गत येणाऱया आशिर्वाद पिठाची मागणी मागच्या आर्थिक वर्षात 6 हजार कोटींवर पोहोचली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यात साधारण 30 टक्के वाढ दिसली असून खाद्यपदार्थात आयटीसी आघाडीवरची कंपनी ठरली आहे. 2020 आर्थिक वर्षामध्ये 7.3 टक्के वाढ दर्शवत विक्री 10 हजार 377 कोटी रुपयांवर आली आहे. आयटीसीने आपल्या वार्षिक अहवालातून ही माहिती दिली आहे. दुसरीकडे बिस्कीट क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजची विक्री 10 हजार 986 कोटी रुपयांवर राहिली आहे. नेस्ले इंडियाने मागच्या आर्थिक वर्षात 12 हजार 368 कोटी रुपयांची विक्री केली होती. आयटीसीने आपल्या उत्पादनांचा दर्जा कायम राखला असून त्यांच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी होते आहे. विशेषत: आशीर्वाद ब्रँडच्या उत्पादनांनी बाजारात विक्रीमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. आशिर्वाद आटा (पीठ) तर आता जवळपास 3.6 कोटी घरांमध्ये वापरले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागच्या आर्थिक वर्षात एफएमसीजी क्षेत्रातील वाटा पाहता खाद्य व्यवसायाने 80 टक्के इतका दणकेबाज वाटा उचलल्याचे दिसून आले आहे. यात वाटा उचलताना सनफिस्टची विक्री 4 हजार कोटींची तर बिंगो स्नॅक्सची विक्री 2 हजार 700 कोटींची मागच्या आर्थिक वर्षात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.