यूएईमध्ये उर्वरित 31 सामने 30 दिवसांत पूर्ण करण्याची बीसीसीआयची योजना,
वृत्तसंस्था, / मुंबई
कोरोनाच्या उद्रेकामुळे तहकूब करण्यात आलेल्या आयपीएलच्या चौदाव्या पर्वाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले असून उर्वरित 31 सामने 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत घेतले जाणार आहेत. 29 मे रोजी बीसीसीआय कार्यकारिणीची वार्षिक बैठक होणार असून त्यात या संदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये असून या दोन संघांतील पाच कसोटींची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसऱया व तिसऱया कसोटीमध्ये नऊ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले असल्याकडे सूत्राने लक्ष वेधले आहे. ‘हे अंतर चार दिवसांवर आणले तर बीसीसीआयला या जादा पाच दिवसांचा उपयोग करता येणार आहे,’ असे या सूत्राने म्हटले आहे. भारत-इंग्लंड मालिकेसाठी एकूण 41 दिवसांचा विंडो ठेवण्यात आला आहे. त्यात बदल करण्याबाबत बीसीसीआयने ईसीबीशी अद्याप चर्चा केलेली नाही. याबाबतही बैठकीत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
दुसऱया टप्प्यासाठी 30 दिवसांचा विंडो
बीसीसीआयने जर ईसीबीला विनंती करण्याचे टाळले आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल दुसरा टप्पा घेण्याची योजना आखली तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 30 दिवसांचा विंडो त्यांना मिळणार आहे. ‘भारत-इंग्लंड मालिकेतील जादाचे पाच दिवस मिळाले तर आयपीएल विंडो वाढण्यास मदतच होणार आहे. पण तसे न झाल्यास 30 दिवसांच्या विंडोनंतर भारत व इंग्लंड दोन्ही संघांसाठी एक दिवस मोकळा ठेवावा लागेल. तेथून ते थेट संयुक्त अरब अमिरातला जाऊ शकतील. त्यानंतर बाद फेरीसाठी पाच दिवस राखून ठेवावे लागतील. त्यामुळे बीसीसीआयला 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवस मिळतील. या कालावधीत चार वीकेंड येणार असल्याने आठ शनिवार-रविवारी दोन-दोन सामने ठेवल्याने 16 सामन्यांची व्यवस्था होईल. नंतर 19 दिवसांत 11 सामने पूर्ण करावे लागणार असून यासाठी एक जादा आठवडा लागणार आहे,’ असे या सूत्राने स्पष्ट केले. हा जादाचा आठवडा सुरुवातीला व शेवटी ऍडजस्ट करावा लागणार आहे.
जर बीसीसीआयने ईसीबीला विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली तर दोन्ही संघांच्या खेळाडूंना टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी थोडासा अवधी मिळणार आहे. ही स्पर्धा 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय आयपीएलच्या बाद फेरीत जे खेळाडू सहभागी होणार नाहीत, त्यांनी विश्वचषकासाठी आपापल्या संघात दाखल व्हावे, असे बीसीसीआयला वाटते. तसेच आयपीएल ही विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच खेळाडूंना खूपच उपयुक्त ठरेल, असेही बीसीसीआयला वाटते, असेही या सूत्राने सांगितले. विश्वचषक विंडोला काही अडथळा आला नाही तर आयसीसी देखील आयपीएलच्या आयोजनात हस्तक्षेप करणार नाही. बीसीसीआयला विश्वचषक स्पर्धा भारतातच आयोजित करायची आहे. येत्या बैठकीतही ते हाच निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.