वृत्तसंस्था / अबु धाबी :
चौकार-षटकारांच्या आतषबाजीने अखेर यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रेक्षकांविना सुरुवात झाली आणि तब्बल 5 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेट चाहत्यांना दिलासा लाभला. या स्पर्धेतील शनिवारी खेळवल्या गेलेल्या सलामी लढतीत मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 162 धावा केल्या.
सौरभ तिवारीची धडाकेबाज खेळी आणि एन्गिडीचे 3 बळी हे या पहिल्या डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले. प्रारंभी, या लढतीत चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. क्विन्टॉन डी कॉकने 20 चेंडूत 5 चौकारांसह 33 धावांची आतषबाजी करताना कर्णधार रोहितसमवेत 4.4 षटकातच 46 धावांची दणकेबाज सलामी दिली. पण, रोहित 10 चेंडूत 12 धावांवरच बाद झाला होता.
तिसऱया स्थानावरील सुर्यकुमार यादवला देखील 16 चेंडूत 17 धावांचे किरकोळ योगदान देता आले. चौथ्या स्थानावरील सौरभ तिवारीने मात्र 31 चेंडूत 3 चौकार व एका षटकारासह 42 धावांची जोरदार फटकेबाजी केली. हार्दिक पंडय़ा (14) व केरॉन पोलार्ड (18) या उभयतांनी प्रारंभीच उत्तूंग फटके लगावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले होते. मात्र, यापैकी एकालाही उत्तम, आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही.
चेन्नई सुपरकिंग्सतर्फे एन्गिडीने सर्वात भेदक मारा करताना 4 षटकात 38 धावात 3 बळी घेतले तर दीपक चहर व रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
सॅम करण व पियुष चावला यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.