किंग्स इलेव्हन पंजाबचे सहभागीदार नेस वाडिया यांची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन्ही देशातील युद्धजन्य तणावाची परिस्थिती पाहता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील चायनीज प्रायोजकांची हळूहळू का होईना, पण, हकालपट्टी करावी, अशी स्पष्ट सूचना किंग्स इलेव्हन पंजाबचे सहभागीदार नेस वाडिया यांनी केली. 15 जून रोजी गलवान खोऱयातील संघर्षात 20 भारतीय जवान धारातीर्थी पडले, त्यानंतर चायनीज उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची एकमुखी मागणी होत आली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना त्यात आपली आतापर्यंत किती हानी झाली, हे चीनने अद्याप जाहीर केलेले नाही.
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली होती. पण, ही बैठक अद्याप झालेली नाही. भारताने सोमवारीच 59 चायनीज ऍपवर बंदी घालत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. चायनीज मोबाईल कंपनी व्हिवो सध्या आयपीएल स्पर्धेचे प्रायोजक असून बीसीसीआयला ते करारापोटी दरवर्षी 440 कोटी रुपये अदा करतात. उभयतांतील 5 वर्षांचा हा करार 2022 पर्यंतचा आहे.
पेटीएम, स्विगी, ड्रीम 11 या कंपन्यांची देखील आयपीएलमध्ये गुंतवणूक आहे. फक्त आयपीएलच नव्हे तर त्यातील प्रँचायजींनाही चायनीज प्रायोजकत्वाने मोहित केले आहे.
‘प्रारंभी, नवा प्रायोजक शोधणे कठीण जाऊ शकते. पण, असे अनेक भारतीय प्रायोजक आहेत, जे सध्याच्या प्रायोजक कंपनीची जागा घेऊ शकतात. देशाप्रती, आपल्या सरकारप्रती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली, त्या सैनिकाप्रती आदर, बांधिलकी व्यक्त करायलाच हवी’, याचा वाडिया यांनी पुढे उल्लेख केला.
एकीकडे, नेस वाडिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असताना दुसरीकडे, चेन्नई सुपरकिंग्स संघाने केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्याचे आम्ही पालन करु, असे नमूद केले. अन्य एका प्रँचायझीने प्रथम सरकारला निर्णय घेऊद्यात. ते जो निर्णय घेतील, त्याचे आम्ही अनुकरण करु, असे स्पष्ट केले. नेस वाडिया यांनी मात्र सरकारच्या दिशानिर्देशाची प्रतीक्षा करण्याऐवजी आपली नैतिक जबाबदारी आपण पार पाडायला हवी, असे नमूद केले. बीसीसीआय अध्यक्ष असतो तर आतापर्यंत मी आगामी हंगामाकरिता भारतीय प्रायोजक शोधा, अशी सूचना यापूर्वीच केली असती, असेही ते म्हणाले.
‘चिनी कंपन्यांनी जी संधी, लाभ आयपीएलमध्ये पाहिला, तेच भारतीय कंपन्यांनी आता पहायला हवे. कारण, आयपीएल ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम टी-20 लीग आहे. याशिवाय, ज्या संघांचे प्रायोजक चिनी कंपन्या आहेत, त्यांनाही बदल करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. त्यांची जागा घेऊ शकतील, अशा अनेक कंपन्या भारतात आहेत.
ऍपवर बंदीच्या निर्णयाचे स्वागत
केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली, त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मी स्वतः चीनची उत्पादने अजिबात विकत घेत नाही. कारण, ती दुय्यम दर्जाची असतात. भारतीय उत्पादन खरेदीवर माझा भर असतो. स्वस्त चायनीज उत्पादने रोखली नाहीत तर भारतीय उत्पादन क्षेत्र नावापुरतेही शिल्लक राहणार नाही’, अशी भीती नेस वाडिया यांनी शेवटी व्यक्त केली.
1967 नंतर पहिलाच संघर्ष
गलवान खोऱयात चिनी सैनिकांनी दगडधोंडे, लोखंडी रॉड, धारदार स्टीक्स व क्लब्सचा वापर करत भारतीय सैनिकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भारतीय सैनिकांना त्यावर प्रत्युत्तर देणे भागच होते. चीनने आगळीक केल्यामुळे हा संघर्ष विकोपाला पोचला. 1967 नंतर दोन्ही सैन्यदलात झडलेला हा पहिलाच संघर्ष ठरला. 1967 मध्ये नथू ला येथे झडलेल्या संघर्षात भारताने 80 जवान गमावले तर चीनच्या 300 सैनिकांचे बळी गेले होते.