वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढविली असल्याने प्रतिवर्षी होणारी आयपीएल स्पर्धाही आता पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. याआधी 14 एप्रिलपर्यंत ती लांबणीवर टाकण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढविली असल्याचे जाहीर केले. पहिल्यांदा 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते तेव्हा आयपीएलनेही स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी ही स्पर्धा एप्रिल-मे या कालावधीत होत असते. पण आता लॉकडाऊनमुळे हा कालावधी संपणार असल्याने आयपीएलचे या वर्षीचे भवितव्य काय, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. 3 मेनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी सरकार आणखी कोणते निर्णय घेणार, हे पाहूनच बीसीसीआयला आयपीएलबाबत पुढील निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.
यावर्षीची आयपीएल स्पर्धा 29 मार्चपासून सुरू होणार होती. एप्रिल-मे हा या स्पर्धेसाठी राखून ठेवलेला कालावधी आहे. पण कालावधी लॉकडाऊनमुळे वाया गेला असल्याने आणि भारतासह अन्य देशांचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम असल्याने कदाचित ही स्पर्धा रद्द केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही स्पर्धा आणखी लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता बोलून दाखविली होती. ‘जगभरात जवळपास सर्वच ठिकाणी जनजीवन ठप्प झाले असल्याने त्यात खेळाला स्थान आहेच कुठे,’ असे त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले होते. ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, आणि इतक्यातच आयपीएलबाबत निश्चित काही सांगू शकणार नाही. प्रत्येक जण घरी आहे, सर्व वाहने, प्रवासी वाहतूक, कार्यालये बंद आहेत. ही स्थिती मेच्या मध्यापर्यंत अशीच राहणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरची शक्यता जर-तरवर अवलंबून असल्यामुळे आयपीएलबाबत आता काहीच सांगता येणार नाही,’ असेही त्यांनी म्हटले होते.