वृत्तसंस्था/ सिडनी
भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे या दौऱयाचे दडपण कमी झाले असल्याचे प्रतिपादन वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीने केले आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना मोहम्मद शमीच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून आले. या स्पर्धेत त्याने 20 बळी मिळविले. शमीचा आत्मविश्वास या कामगिरीने वाढला आहे.
ऑस्ट्रेलियाचा दौरा हा नेहमीच भारतीय संघाच्या दृष्टीकोनातून खडतर मानला जातो. या दौऱयासाठी नेहमीच भारतीय संघातील खेळाडूवर चांगल्या कामगिरीसाठी दडपण येत असते पण आयपीएल स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीने ऑस्ट्रेलिया दौऱयासाठीचे दडपण मला आता जाणवत नाही, असे मोहम्मद शमीने सांगितले. आगामी कसोटी मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपण सध्या जोरदार सराव करत असल्याचे त्याने सांगितले. शारिरीक तंदुरूस्तीला प्राधान्य देत गोलंदाजीचा खडतर सराव करण्यावर माझे प्रमुख लक्ष आहे, असेही शमीने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत पण मी नेहमीच कसोटी मालिकेला अधिक प्राधान्य देतो. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजीला अनुकूल असतात. या खेळपट्टय़ावर चेंडू अनपेक्षित उसळतो. दरम्यान अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे तसेच वेगामध्ये बदल जरूरीचा असल्याचे शमीने म्हटले आहे. रिव्हर्स स्विंग करणाऱया गोलंदाजाला या खेळपट्टया अधिक अनुकूल ठरतील. विदेशामध्ये मालिका खेळताना तेथील वातावरण आणि खेळपट्टय़ा यांच्याशी भारतीय खेळाडू लवकर समरस होत असल्याचे चित्र गेल्या काही दौऱयामध्ये दिसून आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिका चुरशीच्या होतील, असे मोहम्मद शमीने म्हटले आहे.