वृत्तसंस्था/ हैद्राबाद
कोरोना महामारी संकटामुळे 2020 मधील आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता ही स्पर्धा दुसऱया देशात खेळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेत आपण जगातील कोणत्याही ठिकाणी खेळण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने केले आहे.
चालू वर्षांच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी ऍडलेड येथे दिवस-रात्रीची होणार असून आपल्या समोर हे मोठे आव्हान असल्याचे भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेला ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. आयपीएल स्पर्धेत भुवनेश्वर कुमारने गेली बरीच वर्षे सनरायजर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 21 कसोटी, 114 वनडे आणि 43 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना क्रिकेटच्या या तीन प्रकारात त्याने एकूण 236 बळी मिळविले आहेत. 2008-09 च्या रणजी हंगामात तत्कालीन 19 वर्षीय भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच चेंडूवर मुंबईच्या सचिन तेंडुलकरला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत केले होते. या कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमार अधिक प्रकाशझोतात आला होता.