वार्ताहर/ राजापूर
तालुक्यातील आंबोळगड किनाऱयावरील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. यापुढे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संचालक आणि ग्रामस्थ यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासनही ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.
नाटे ते आंबोळगड या समुद्रकिनाऱयावर आयलॉग कंपनीतर्फे बंदर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाविरोधात व आंबोळगडमधील जैवविविधतेच्या रक्षणासाठी 6 फेब्रुवारी रोजी जनहक्क सेवा समितीच्यावतीने राजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर आयलॉग प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी आंबोळगड परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली.
आंबोळगडाच्या रूपेरी वाळूचा 5 किलोमीटर लांब सुंदर, निसर्गरम्य आणि जैवविविधतेने समुद्रकिनारा वाचवण्यासाठीचा जैवविविधता दर्शवणारा अहवाल जो बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आदेशानेच तयार केला होता, त्याची माहिती ठाकरे यांना करून देण्यात आली. ग्रामस्थांचे बोलणे ऐकल्यानंतर ठाकरे यांनी आयलॉग बंदर प्रकल्पाला स्थगिती दिली. तसेच यापुढे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकांना आणि ग्रामस्थांना बोलवून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी आंबोळगडवासियांना दिले.
आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवून 6 फेब्रुवारी रोजीचे राजापूर तहसील कार्यालयावरील जन हक्क सेवा समितीचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले. तसेच या निर्णयाबद्दल मंत्री आदित्य ठाकरे व उदय सामंत यांचे नाटे पंचक्रोशी परिसर बचाव समिती, जन हक्क सेवा समिती आणि आंबोळगड ग्रामस्थांच्यावतीने आभार मानण्यात आले.