वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या डे-नाईट कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीला ‘सामान्य’ असल्याचा शेरा आयसीसीने दिला आहे. त्यामुळे या मैदानावरील संभाव्य कारवाई टळली आहे. दोन दिवसातच ही कसोटी भारताने जिंकल्यानंतर खेळपट्टीच्या दर्जाबाबत इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
आयसीसीने रुल्स अँड रेग्युलेशन्समध्ये अलीकडे झालेल्या सामन्यांच्या खेळपट्टय़ांचे अपडेशन केले असून त्यात तिसऱया कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला ‘सामान्य’ आणि चौथ्या कसोटीला वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला ‘उत्तम’ असा शेरा त्यांनी दिला आहे. पहिल्या टी-20 साठी वापरलेली खेळपट्टी ‘अतिउत्तम’ दर्जाची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱया कसोटीत वापरण्यात आलेली सिडनीची खेळपट्टीही मोटेराप्रमाणे ‘सामान्य’ असल्याचा शेरा आयसीसीने दिला आहे.
भारताने गुलाबी चेंडूने खेळविण्यात आलेली डे-नाईट कसोटी 10 गडय़ांनी जिंकली होती. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर दोन्ही संघांना दीडशे धावांची मजलही मारता आली नव्हती. भारताने 145 व बिनबाद 49 धावा जमविल्या होत्या तर इंग्लंडने अक्षर पटेलच्या फिरकीसमोर शरणागती पत्करताना 112 व 81 धावा जमविल्या होत्या. या खेळपट्टीला अतिसामान्य शेरा मिळाला असता तर या केंदावर निर्बंध घातले जाण्याची शक्यता होती.
चेन्नईत झालेली दुसरी कसोटी भारताने जिंकून बरोबरी साधली होती. त्या खेळपट्टीलाही ‘सामान्य’ शेरा मिळाला आहे. मात्र या मैदानावर इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली होती, त्या खेळपट्टीला ‘अतिउत्तम’ असा शेरा मिळाला आहे. चौथी कसोटी ‘उत्तम’ खेळपट्टीवर झाली असल्याचे मत आयसीसीने दिले आहे. प्रत्येक कसोटी, वनडे, टी-20 सामने झाल्यानंतर खेळपट्टीचा स्वभाव व त्यावर झालेली कामगिरी यांचा अहवाल आयसीसीला मिळत असतो. सामन्याधिकाऱयांकडून हा अहवाल त्यांना मिळत असतो. खेळपट्टी किंवा आऊटफील्ड अतिसामान्य दर्जाचे असल्यास त्या केंद्रावर आयसीसीकडून निर्बंध घालण्यात येतात.