वृत्तसंस्था /दुबई
2021 च्या आयसीसीच्या कसोटी संघामध्ये भारताच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आयसीसीच्या 2021 सालातील सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटू समावेश नाही.
2021 च्या क्रिकेट हंगामामध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत दर्जाहीन झाली. दरम्यान आयसीसीच्या 2021 सालातील सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नसल्याबद्दल फारसे आश्च़र्यकारक गोष्ट नाही. भारतीय संघाने केवळ सहा सामने खेळले. आयसीसीच्या वनडे संघामध्ये आयर्लंडच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. कसोटी क्रिकेट प्रकारामध्ये निवडण्यात आलेल्या आयसीसीच्या सर्वोत्तम संघामध्ये न्यूझीलंडच्या केन विलीयमसनची कर्णधार म्हणून निवड केली आहे. 2021 च्या कालावधीत भारताने एकूण 14 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. गेल्यावर्षी भारताला तीन कसोटी सामने गमवावे लागले. त्यामध्ये आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम सामनाचा समावेश आहे.
सलामीचा फलंदाज रोहित शर्माने 2021 च्या क्रिकेट हंगामात 47.68 धावांच्या सरासरीने 906 धावा जमविताना दोन शतके झळकविली. इंग्लंडविरूद्ध रोहितने दोन शतके नोंदविली. इंग्लंडविरूद्धच्या चेन्नाईतील कसोटीत तसेच ओव्हलच्या मैदानावर ढगाळ वातावरणात रोहितची शतके निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागतील. रोहित शर्माकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये लाभलेला दिल्लीचा ऋषभ पंत हा यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. भारतीय निवड समितीने पंतला आता नियमीत यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली आहे. पंतने 2021 च्या क्रिकेट हंगामात 12 सामन्यात 39.36 च्या धावांच्या सरासरीने 748 धावा जमविल्या असून अहमदाबाद येथे इंंग्लंडविरूद्धच्या कसोटीत शानदार शतक त्याने झळकविले. पंतच्या यष्टीरक्षणामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्याने 23 डावामध्ये 39 झेल टिपले आहेत.
भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 2021 च्या क्रिकेट हंगामात 9 सामन्यांत 16.64 धावांच्या सरासरीने 54 बळी नोंदविले. मायदेशात झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत त्याची गोलंदाजीतील कामगिरी दर्जेदार झाली तसेच त्याने फलंदाजीत 25.35 धावांच्या सरासरीने 355 धावा जमविल्या. चेन्नाईमध्ये झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनचे शतक महत्त्वाचे ठरले होते. आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघामध्ये लंकेचा दिमुथ करूणारत्ने, ऑस्ट्रेलियाचा लाबुसिंघे, इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा जेमिसन तसेच पाकच्या फवाद आलम, हसन अली आणि शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे.
आयसीसीच्या झालेल्या पहिल्याच कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत न्यूझीलंडने अजिंक्यपद पटकाविताना अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. या कामगिरीमुळे साहजिकच विलीयमसनची आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. विलीयमसनने चार सामन्यात 65.83 धावांच्या सरासरीने 395 धावा जमविताना एक शतक झळकविले. आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, इंग्लं। न्यूझीलंड किंवा विंडीजच्या एकाही खेळाडूला या संघात स्थान मिळवू शकले नाही. पाकच्या बाबर आझमचे या संघाच्या कर्णधापदी निवड करण्यात आली. पाकचा फ्रक झमान, दक्षिण आफ्रिकेचे मॅलेन, व्हॅन डेर डय़ुसेन, बांगलादेशचे शकीब अल हसन, मुस्ताफिजुर रेहमान आणि मुशफिकर रहीम, लंकेचे हसरंगा, डी. चमिरा, आयर्लंडचे पॉल स्टर्लिंग आणि सिमी सिंग यांचा समावेश आहे. 2021 च्या कालावधीत भारताने सहा वनडे सामने खेळले असून त्यापैकी चार सामने जिंकले तर दोन सामने गमविले.