अनिल कुंबळेंच्या नेतृत्वाखालील आयसीसी समितीची यजमान देशातील पंचांना पसंती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चेंडूला चकाकी आणण्यासाठी सलाईव्हा लावणे हा पूर्वापार चालत आलेला प्रकार यापुढे कायमचा बंद करावा, अशी स्पष्ट शिफारस अनिल कुंबळेंच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. मात्र, याचवेळी चेंडूला ‘स्वीट’ लावण्यामुळे आरोग्याला काहीही धोका नाही, असा निर्वाळाही त्यांनी येथे दिला. व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आयसीसी समितीची विस्तृत चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी रितसर शिफारस केली.
आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही पंच यजमान देशाचेच असावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस देखील या समितीने केली आहे. यजमान देशातील पंचांकडून एकतर्फी पंचगिरी केली जाते, अशी टीका झाल्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात तटस्थ पंचांना पसंती देण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. पण, आता कुंबळेंच्या समितीने पुन्हा एकदा स्थानिक पंचांनाच पाचारण केले जावे, अशी सूचना केली आहे.
डीआरएस वाढवण्याची सूचना
सध्याच्या घडीला खेळाडू डीआरएस घेऊ शकतात. त्यामुळे, निकाल बिनचूक दिला जाऊ शकतो. त्यामुळे, तटस्थ पंच नसले तरी चालण्यासारखे आहे, असा कुंबळेंच्या समितीचा होरा आहे. हा प्रस्ताव लागू करताना डावात दोनऐवजी तीन डीआरएस घेता येतील, असा बदलही त्यांनी सूचवला आहे.
‘आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी सलाईव्हाच्या माध्यमातून धोकादायक विषाणूचा कसा प्रसार होऊ शकतो, हे आयसीसी क्रिकेट समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सलाईव्हाने चेंडू पॉलिश करण्याची ही पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला व त्याप्रमाणे शिफारस केली जात आहे’, असे आयसीसी क्रिकेट समितीने पत्रकातून नमूद केले.
सलाईव्हाचा वापर चेंडूला चकाकी देण्यासाठी विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये मोठय़ा प्रमाणात केला जातो. चेंडूला सलाईव्हा लावल्याने तो अधिक स्विंग होतो. पण, अवघे जग एका विषाणूविरुद्ध लढत असताना सलाईव्हा लावण्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याशी खेळले जाऊ नये, हा दृष्टिकोन आयसीसी क्रिकेट समितीने समोर ठेवला आहे.
आयसीसीच्या शिफारशीवर होल्डिंग, वकारची नापसंती
आयसीसी क्रिकेट समिती चेंडूला सलाईव्हा लावण्यावर बंदी लादेल, अशी चर्चा मागील महिन्यापासून रंगली आणि मायकल होल्डिंग, वकार युनूससारख्या दिग्गज माजी जलद गोलंदाजांनी त्यावर तत्काळ आपली नापसंती दर्शवली आहे. चेंडूला सलाईव्हा लावणे बंद झाल्यानंतर फलंदाज व गोलंदाज यांच्यात जुगलबंदी कशी रंगणार, असा प्रश्न या उभयतांनी उपस्थित केला. तसेच यामुळे खेळातील रंगतच कमी होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तटस्थ पंचांची परंपरा 2002 पासून
एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन तटस्थ पंच नेमण्याची कल्पना सर्वप्रथम 2002 मध्ये अंमलात आणली गेली. त्यापूर्वी 1994 ते 2001 या कालावधीत एक तटस्थ पंच व एक यजमान देशाचा पंच उतरवले जात होते. यजमान देशांचे पंच आपल्या संघाला अनुकूल पंचगिरी करत असल्याची तक्रार वाढल्यानंतर पुढे दोन तटस्थ पंचांची संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली.