नव्या दमाच्या चेहऱयांना संधी : तृणमूल नेते लुईझिन फालेरो यांची घोषणा
प्रतिनिधी / पणजी
तृणमूल हा देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने खऱया अर्थाने महिला सबलीकरण मार्गी लावले असून सर्वाधिक 41 टक्के महिलांना प्रतिनिधीत्व दिले आहे. तीच परंपरा गोव्यातही चालू ठेवणार असून अधिकाधिक महिलांनी या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन नुकतेच तृणमूल पक्षात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी केले आहे. आयाराम-गयाराम संस्कृतीस आम्ही मूठमाती देणार असून चाळीसही मतदारसंघात नव्या दमाच्या चेहऱयांना संधी देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी कोलकाता येथे तृणमूल पक्षात प्रवेश करून गोव्यात परतल्यानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत तृणमुलचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन, मुख्य व्हीप शुखेंदू शेखर रॉय, लोकसभा खासदार प्रसून बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे क्रीडा व युवा व्यवहारमंत्री मनोज तिवारी यांची उपस्थिती होती. त्याशिवाय व्यासपीठावर ऍड. यतीश नाईक, लवू मामलेदार, विजय पै, मारियो पिंटो, आनंद नाईक, एन शिवदास, राजेंद्र काकोडकर, आंतोनियो कॉस्टा यांची उपस्थिती होती.
कुणाशीही युती नाही
पुढे बोलताना फालेरो यांनी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लवकरच गोव्याला भेट देणार असून ’पितृपक्ष’ संपल्यानंतर त्या गोव्यात दाखल होतील. त्यावेळी अनेक नवीन चेहरे पक्षात दाखल होणार आहेत. गोव्याचे विद्यमान सरकार तसेच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना लोक कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांना नव्या पर्यायाची अपेक्षा असून तृणमुलच्या रुपाने त्यांना हा पर्याय प्राप्त झाला असल्याचेही ते म्हणाले. भाजपला हरविणे हे आमचे ध्येय आहे. येती विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून कोणाशीही युती करणार नाही, असे ते म्हणाले.
विद्यमान भाजप सरकारने कोळसा संस्कृती आणून निसर्गसंपन्न गोव्याचा चेहरा काळवंडून टाकला आहे. राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा खाण घोटाळ्यातील 35 हजार कोटी अद्याप वसूल करण्यात आलेले नाहीत, असे सांगून निवडणूक प्रचारादरम्यान या सर्व भानगडी आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असे फालेरो यांनी जाहीर केले.